
हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस कधी उकाडा अशी स्थिती आहे. मागच्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस राज्यात धुमाकूळ घालताना दिसला. सतत पाऊस सुरू होता. गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. आता राज्यावरील अवकाळीचे संकट दूर झाले असून उन्हाचा कडाका वाढला. आजही तापमानात सतत चढउतार बघायला मिळेल. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. फेब्रुवारी महिन्यात थंडी जवळपास गायब झाली. डिसेंबर महिन्यात फक्त म्हणावी तशी थंडी अनेक भागात झाली. उत्तरेकडे कडाक्याची थंडी होती, पारा खाली जात होता. मात्र, म्हणाव्या तश्या शीतलहरी राज्यात दाखल होत नव्हत्या. 1 जानेवारी 2026 रोजी राज्यात मोठा पाऊस झाला. या पावसानंतर राज्यातील थंडी गायब झाली. फेब्रुवारी महिन्यात राज्यात हवामानात मोठा बदल होताना दिसला. थंडी, पाऊस आणि उकाडा असे तिन्ही हंगाम अनुभवता आली.
राज्यात उकाडा वाढू लागला आहे.दुपारच्या पारी घराबाहेर पडणेही कठीण झालंय. उन्हाचा चटका अधिक तीव्र होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला. पंजाबच्या भटिंडा येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. भटिंडा येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 12.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोला येथे 36.3 सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
शहरासह पुणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सातत्याने घटत असलेल्या किमान तापमानात शुक्रवारी दोन ते तीन अंशाने वाढ झाली. परिणामी पहाटेचा गारवा कमी झाला असून दिवसभरात कमाल तापमानातही वाढ झाल्यामुळे दुपारचा उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. लोहगाव येथे सर्वाधिक 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
जिल्ह्यातील शिरूर, कुरवंडे यासह एनडीए आणि हवेली परिसरात गेल्या 24 तासांत किमान तापमान 8 अंशापर्यंत खाली आल्यामुळे पहाटेचा गारवा वाढला होता. मागील आठवड्यात शहरासह जिल्ह्यात ऊन, ढगाळ वातावरण आणि गारवा असा हवामानाचा लपंडाव सुरू आहे. दोन दिवसांपासून पहाटे जाणवणारी थंडी गायब झाली आहे. किमान तापमान 11 ते 12अंशाच्या पुढे नोंदविले गेले.