नौसेनेच्या झेंड्यात आता गुलामीचं चिन्ह नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिक- मोदी

भारत कशाप्रकारे गुलामगिरीच्या मानसिकतेला सोडून पुढे जात आहे, हे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही उदाहरणं दिली. नौसेनेच्या झेंड्यावर आता गुलामीचं नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिक असल्याचं त्यांनी सांगितलं.

नौसेनेच्या झेंड्यात आता गुलामीचं चिन्ह नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिक- मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Image Credit source: Youtube
| Updated on: Mar 30, 2025 | 1:13 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी केली. या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, “जर आपण आपल्या देशाच्या इतिहासावर नजर टाकली तर शेकडो वर्षे गुलामगिरी, आक्रमणं आणि भारताची सामाजिक रचना नष्ट करण्याचे क्रूर प्रयत्न झाले. पण भारताची चेतना कधीच संपली नाही, त्याची ज्योत तेवत राहिली.” मोदींनी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील स्मृति मंदिरात संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव गोळवलकर यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ते दीक्षाभूमीला गेले आणि तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.

काय म्हणाले मोदी?

“जेव्हा निती आणि निर्णयांमध्ये देशाचं हितच सर्वांत मोठं असतं, तेव्हा सर्वत्र त्याचा प्रभाव आणि प्रकाश दिसून येतो. भारतासाठी हे सर्वांत महत्त्वाचं आहे की आपण त्या बेड्यांना तोडून टाकावं ज्यामध्ये देश अडकलेला होता. आज आपण पाहतोय की भारत कशाप्रकारे गुलामगिरीच्या मानसिकतेला सोडून पुढे जातोय. गुलामीच्या निशाण्यांची ज्या हिन भावनेत 70 वर्षांपासून पेरणी केली जात होती, त्यांच्या जागी आता राष्ट्रीय गौरवाचे नवे अध्याय लिहिले जात आहेत. ते इंग्रजी कायदे ज्यांना भारताच्या लोकांना अपमानित करण्यासाठी बनवलं गेलं होतं, देशाने त्यांना बदललंय. गुलामीच्या विचारांनी बनलेल्या दंड संहितेच्या जागी आता भारतीय न्याय संहिता लागू झाली आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नौसेनेच्या झेंड्याविषयी त्यांनी सांगितलं, “आपल्या लोकशाहीच्या प्रांगणात आता राजपथ नाही कर्तव्यपथ आहे. आपल्या नौसेनेच्या ध्वजातही गुलामीचं चिन्ह छापलेलं होतं. त्याची जागा आता नौसेनेच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक फडकतंय. अंदमानचे द्विप जिथे वीर सावरकरांनी राष्ट्रासाठी यातना सहन केल्या, जिथे नेताजी सुभाष बाबूंनी स्वातंत्र्याचं बिगुल वाजवलं, त्या द्विपांची नावंसुद्धा आता स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणात ठेवली आहेत.”

संघाच्या कामाचं कौतुक करताना मोदी म्हणाले, “विदर्भातील महान संत गुलाबराव महाराज यांना डोळ्यांनी दिसत नव्हतं. तरीही त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. दिसत नसतानाही त्यांनी एवढी पुस्तकं कशी लिहिली? त्यांच्याकडे नेत्र नव्हते. पण दृष्टी होती. ही दृष्टी बोधातून येते. विवेकातून प्रकट होते. ही दृष्टी व्यक्तीसोबत समाजाला शक्ती देते. आपला संघही असा संस्कार यज्ञ आहे. जो अंतरदृष्टी आणि बाह्यदृष्टीसाठी काम करत आहे. बाह्यदृष्टीसाठी आपण माधव नेत्रालयला पाहतो. आणि अंतरदृष्टीने संघाला सेवेचा पर्याय दिला आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us