लग्नासाठी एवढा पैसा आणला कुठून? मुलीच्या भर लग्न मंडपात इंदोरीकर महाराजांचं थेट उत्तर, सगळा हिशोबच सांगून टाकला
आज इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाहसहोळा झाला, या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या लग्नसोहळ्यात बोलताना महाराजांनी मोठं विधान केलं आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा आज अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी इंदोरीकर महाराजांनी मोठा खर्च केला आहे. यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीच्या ज्ञानेश्वरी देशमुख यांच्या साखरपुड्यात देखील मोठा खर्च केला होता, यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत होती. महाराज किर्तनामध्ये लग्न साधेपणाने करण्याचा सल्ला देतात, लग्नात फार खर्च करू नका असं म्हणतात. मात्र मग स्वत:च्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च का केला असा सवाल त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता. परंतु त्यानंतर आता इंदोरीकर महाराज यांनी आपल्या मुलीचं लग्न मोठ्या थाटात केलं आहे. साखरपुड्यापेक्षाही कितीतरी अधिक पटीने खर्च त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात केला आहे, त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नेमकं काय म्हणाले इंदोरीकर महाराज?
दरम्यान मुलीच्या लग्नसोहळ्यात मनोगत व्यक्त करताना इंदोरीकर महाराज यांनी आपल्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे. ‘ जशी साखरपुड्याची चर्चा महिनाभर चालली तशी विवाहाची चर्चा आता वर्षभर होईल. ज्याची परिस्थिती चांगली त्यांनी विवाहसोहळा करावा. लग्नात मी मठ्ठा , गुलाबजाम केले नाही. लग्नामध्ये मराठमोळं आणि सात्विक जेवन होतं. आज मुलगा , मुलगी मोठी झाले ते दिसत आहे. मी किर्तनासाठी फिरत असल्याने त्यांची भेट होत नव्हती. माझी आणि माझ्या मुलाची देखील तिन वर्ष झाले भेट नाही. मी विद्यालय चालवतो. एक रुपया घेत नाही. शाळेत 13 शिक्षक आहेत,’ असं यावेळी इंदोरीकर महाराज यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आता प्रश्न विचारला जाईल एवढा पैसा कुठून आला ? माझ्या भक्तमंडळाने 90 टक्के खर्च केला. देणाऱ्याने दिला. त्यामुळे ट्रोल करण्याचा कोणाला अधिकार नाही. एक हटयुग आणि दुसरा ज्ञानयोग, असे दोन योग आहेत. नास्तिक लोक त्यांचा मुळ स्वभाव सोडत नाहीत. जेवढ प्रेम तुम्ही माझ्यावर केलं प्रेम टिकवलं, तसंच हे प्रेम आता मुलाप्रमाणे शेवटपर्यंत टिकवावे, असं यावेळी इंदोरीकर महाराज यांनी म्हटलं आहे.
