इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सध्या युद्धामुळे आयात-निर्यात विस्कळीत झाली आहे. कंटेनर शिपमेंटमध्ये अडथळे निर्माण होत आहे. कच्च्या मालाचे दर वाढले आहेत, तर दुसरीकडे डिलिव्हरी उशिरा झाल्यास करार रद्द होण्याचा धोका वाढलाय.... अशात हजारो कामगारांची नोकरी जाण्याची देखील चर्चा सुरु आहे.

इराण–अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्याचा फटका आता स्थानिक उद्योगांनाही बसत असल्याचे चित्र आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरातील १०० हून अधिक कंपन्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक कंपन्यांकडे केवळ एक ते दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक असल्याने उद्योगांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.इराण–अमेरिका युद्धामुळे जागतिक स्तरावर गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा फटका आता डोंबिवली एमआयडीसीतील उद्योगांना बसू लागला आहे.
कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्याने हॉटेल व्यवसायावर आधीच परिणाम झाला आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. डोंबिवली एमआयडीसीतील अनेक कंपन्यांकडे सध्या केवळ एक ते दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे गॅस टंचाई कायम राहिल्यास उत्पादन थांबण्याची भीती उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी परिसरातील कामा संघटनेचे पदाधिकारी देवेन सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसीमध्ये केमिकल क्षेत्रातील सुमारे १२५ कंपन्या तर टेक्स्टाईल क्षेत्रातील सुमारे ११० कंपन्या आहेत.
मात्र सध्या त्यापैकी केवळ ६५ कंपन्याच सुरू आहेत.पूर्वी केमिकल उद्योग एलजीओ किंवा फर्नेस ऑइलसारख्या इंधनाचा वापर करत होते. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नव्या नियमांनुसार अनेक कंपन्यांनी आपल्या बॉयलरमध्ये आधुनिक तंत्रज्ञान बसवत पीएनजी गॅसमध्ये रूपांतर केले आहे. त्यामुळे प्रदूषण कमी झाले असले तरी आता पीएनजी गॅसच्या पुरवठ्यावरच उद्योग पूर्णपणे अवलंबून झाले आहेत.
महानगर गॅसकडून उद्योगांना सांगण्यात आले आहे की, त्यांच्या उपलब्ध साठ्यानुसारच गॅस पुरवठा केला जाईल. त्यानंतर उद्योगांनी पर्यायी इंधनाचा विचार करावा लागेल. मात्र डिझेलसारखे पर्यायी इंधन देखील आयातीवर अवलंबून असल्याने तो पर्यायही उद्योजकांसाठी फारसा सोयीचा नाही. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात व्यवहारांवरही परिणाम झाला आहे.
कंटेनर जहाजांच्या हालचालींवर परिणाम झाल्याने अनेक कंपन्यांचा माल वेळेवर पाठवता येत नाही. परिणामी करार रद्द होण्याचा धोका निर्माण झाला असून कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या एमआयडीसीतील जवळपास ७० टक्के कंपन्यांनी पीएनजी गॅसमध्ये रूपांतर केले असल्याने गॅस पुरवठा खंडित झाल्यास या कंपन्या बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसे झाल्यास हजारो कामगारांवरही बेरोजगारीचे संकट ओढवू शकते. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकांकडून करण्यात येत आहे.
