देवाभाऊ राम, नितेश राणे त्यांचे हनुमान, मुनी निलेशचंद्र यांच्या विधानाची चर्चा, पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर म्हणाले…
निलेशचंद्र मुनी आणि संदीप देशपांडे यांनी एकमेकांवर याआधी थेट टीका केली आहे. निलेशचंद्र मुनी हे कोणत्या शाळेत शिकलेले आहेत, ते मला जाणून घ्यायचे आहे, असे म्हणत देशपांडे यांनी निलेशचंद्र मुनी यांना हिणवलं.

Nileshchandra Muni : मुंबईमध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर काढल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांवर मनसेचे नेते संदीप देशपांडे तसेच ठाकरे गटाकडून आक्षेप घेतले जात आहेत. जैन धर्मियांकडून जैन मुनींच्या स्वागतासाठी रस्त्यावर, सोसायट्यांमध्ये या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या काढल्या जातात. दरम्यान, अनेक ठिकाणी या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांना विरोध झाल्यानंतर त्यांच्यावर दुसरा रंग लावण्यात आला आहे. हा वाद चांगलाच चिघळला असून जैन मुनी निलेशचंद्र आणि संदीप देशपांडे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. याच जैन मुनी निलेशचंद्र यांनी पुन्हा एकदा संदीप देशपांडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राम तर नितेश राणे हनुमान आहेत, असे विधान केले आहे.
निलेशचंद्र मुनी नेमकं काय म्हणाले?
निलेशचंद्र मुनी यांनी संदीप देशपांडे यांच्यावर टीका केली आहे. संदीप देशपांडेंनी पांढऱ्या पट्टीवर काळा रंग टाकला त्यामुळे शनिदेव त्यांच्या कुंडलीमध्ये बसला आहे. तुम्ही सांगता की झाडे लावा. पण सर्वात जास्त झाडे लावण्याचा विक्रम जैन समाजाने रचलेला आहे. प्रत्येक वर्षी आम्हीच सर्वात जास्त झाडे लावतो, असे निलेशचंद्र मुनी म्हणाले.
नितेश राणे हे देवाभाऊंचे राम आहेत
तसेच, तुम्ही नितेश राणे यांना हिरवा म्हणून टीका करता. पण त्यांच्या रक्तामध्ये भगवा आहे. त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेले विचार आहेत. जिथे जिथे हिरवा दिसेल तिथे भगवा करण्याची ताकद नितेश राणे यांच्यात आहे. देवा भाऊ (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) राम आहेत, तर नितेश राणे हे त्यांचे हनुमान आहेत, असेही निलेशचंद्र मुनी म्हणाले.
संदीप देशपांडे आणि निलेशचंद्र मुनी यांची एकमेकांवर टीका
दरम्यान, निलेशचंद्र मुनी आणि संदीप देशपांडे यांनी एकमेकांवर याआधी थेट टीका केली आहे. निलेशचंद्र मुनी हे कोणत्या शाळेत शिकलेले आहेत, ते मला जाणून घ्यायचे आहे, असे म्हणत देशपांडे यांनी निलेशचंद्र मुनी यांना हिणवलं. तर तुम्ही मला बोलवा मग मी तुम्हाला माझे शिक्षण सांगतो, असा पलटवार, निलेशचंद्र मुनी यांनी केला होता. आता पांढऱ्या पट्ट्यांचा वाद नेमका कधी मिटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.