माझ्याकडून काही चुका… निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ

जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

माझ्याकडून काही चुका... निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ
sharad pawar
| Updated on: Jan 12, 2026 | 1:59 PM

राज्यातील महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वजीत मनोहर पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असतानाच, जिल्हा स्तरावरील एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने साथ सोडल्यामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

विश्वजीत पाटील यांच्या पत्रात काय?

विश्वजीत पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना उद्देशून आपले अधिकृत राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट राजीनामा देण्याचे कारण सांगितले आहे. मी माझ्या वैयक्तीक कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि युवक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकुन माझा सन्मान केला. पक्षाचे नेते, जिल्ह्याचे नेते, तालुक्याचे नेते, पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते यांनी सुद्धा मला प्रेमाची वागणुक दिली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आजन्म ऋणी राहील, असे विश्वजीत पाटील यांनी म्हटले आहे.

मला माफ करावे

तसेच केवळ वरिष्ठ नेत्यांकडे राजीनामा न सोपवता, पाटील यांनी आपले राजीनामा पत्र फेसबुकवरही पोस्ट केले आहे. यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पक्षाचे काम करत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ करावे,” असे भावनिक आवाहनही त्यांनी या पोस्टद्वारे केले आहे.

दरम्यान जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाने तरुणांना सोबत घेऊन पक्ष बांधणीवर भर दिला होता. विश्वजीत पाटील हे ग्रामीण भागात सक्रिय चेहरा म्हणून ओळखले जात होते. आता निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी पद सोडल्याने ग्रामीण भागातील पक्ष संघटनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पाटील यांचा पुढील राजकीय प्रवास काय असेल? ते दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणार की राजकारणातून अल्पविश्राम घेणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.