
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे मंत्री अनिल पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याही संपर्कात अनेक नेते आहेत. 4 तारखेनंतर भविष्यामध्ये आपल्याला अनेक घडामोडी या घडताना बघायला मिळतील. काही नेत्यांची चर्चा ही 2019 पासूनच भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची होती. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या बलाढ्य नेत्यांची मानसिकता आता तिथे त्या ठिकाणी राहण्याची नाही”, असं मोठं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना अनिल पाटील यांनी याबाबतचे मोठे संकेत दिले.
“लोकसभा निवडणुकीमध्ये पक्ष फुटीच्या नावाखाली इमोशनल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. चार तारखेनंतर भविष्यामध्ये आपल्याला अनेक घडामोडी या घडताना बघायला मिळतील. ज्या पद्धतीने आम्हाला पक्षातून घालवण्यासाठी रात्रंदिवस लोकांचे प्रयत्न चालू होते. याच लोकांपैकी काही लोकांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जुळून घेण्यासाठी प्रयत्न झालेले दिसतील”, असं भाकीत अनिल पाटील यांनी वर्तवलं.
“काही नेत्यांची चर्चा ही 2019 पासूनच भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची होती. मात्र आता काही नेत्यांना काँग्रेसमध्ये स्थान मिळत असेल, संधी मिळत असेल, तर ते काँग्रेसमध्ये जावू शकतात, भाजपमध्ये जाऊ शकतात, आणि उरलेले काही नेते हे चार तारखेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांच्या संपर्कात आलेले पाहायला मिळतील. पक्ष सोडून बाहेर पडणारे नेते हे जालना जिल्ह्यातील असतील. काही सातारा, सांगली येथील असतील. नागपूरमधल्या काही नेत्यांची नावे मी मागच्या काळात ऐकले आहेत”, असा दावा अनिल पाटील यांनी केला.
“विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या बलाढ्य नेत्यांची मानसिकता आता आहे तिथे राहण्याची नाही. या नेत्यांचं नेतृत्व मागे ठेवून नवीन नेतृत्व पुढे आणण्याचा जो प्रयत्न केला जात आहे त्यामुळे त्यांचे विचार बदललेले आहेत. मात्र विचारांचे कन्वर्जन हे येणाऱ्या चार तारखेनंतर आपल्याला बघायला मिळेल”, असं अनिल पाटील म्हणाले.
“जयंत पाटील हे अत्यंत मॅच्युअर्ड पर्सनॅलिटी असलेले नेते आहेत. अनेक वर्षांपासून जयंत पाटील यांची पक्षात घुसमट सुरू आहे आणि आम्ही बाहेर पडल्यानंतर ती वाढली. जयंत पाटील यांच्या पाठिशी तसेच सोबत महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते असायचे. पण वरिष्ठांच्या माध्यमातून कुठेतरी सातत्याने रोहित पवार यांना पुढे केलं जायचं. याचीच घुसमट जुन्या नेत्यांमध्ये सातत्याने वाढत जाते”, असा दावा अनिल पाटील यांनी केला.
“यापूर्वीही मी बघितलं आहे. त्यामुळे नवीन नेत्याच्या खाली आम्ही कसं काम करायचं? भविष्यात आमचं काय असणार आहे? याची चिंता प्रत्येकाला आहे. त्यांची मनधरणी करण्या इतपत मी एवढा मोठा नेता नाही. मात्र चांगले नेते राष्ट्रवादी अजित पवार गटांसोबत काम करण्यास तयार असतील तर त्यांचे स्वागत करण्यासाठी आनंदच असेल”, असं अनिल पाटील म्हणाले.
“जयंत पाटील येतील का की येणार नाहीत? हे मी सांगणार नाही. मात्र चांगले नेते हे जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असतील त्यांचे स्वागत अजित पवार सुद्धा करतील. सुनील तटकरे हे सुद्धा करतील”, असं अनिल पाटील म्हणाले.