या डोळ्यांमधल्या अश्रूंची जाणीव ठेवा, पाणी पुरवठा मंत्र्यांच्याच जळगावात पाण्यासाठी हाल, काय ही शोकांतिका?

| Updated on: Mar 31, 2024 | 5:23 PM

आयुष्यात शोकांतिका काय असावी याचं प्रत्यय जळगाव ग्रामीणमध्ये राहणाऱ्या नागरिकांना येत असावा. राज्याचा पाणी पुरवठा मंत्री जळगावचा आहे. पण याच भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. पाण्याच्या शोधासाठी प्रचंड भटकंती करावी लागत आहे. खूप हाल सोसावे लागत आहेत. पाणी पुरवठा मंत्र्यांना आपल्याच मतदारसंघातील पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या माता-बघिणींच्या डोळ्यांमधील अश्रूंची जाणीव नसेल का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

या डोळ्यांमधल्या अश्रूंची जाणीव ठेवा, पाणी पुरवठा मंत्र्यांच्याच जळगावात पाण्यासाठी हाल, काय ही शोकांतिका?
Follow us on

किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव : पाणी हे जीवन आहे. कुणालाही पाण्याचे दोन घोट दिले तर पुण्य मिळतं असं मानलं जातं. त्यामुळे या पुण्य कामात तसं पाहायला गेलं तर कोणतीच कसर सुटायला नको. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी तर याकडे कानाडोळा करायलाच नको. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये लोकप्रतिनिधींमध्ये पाण्यासाठी प्रचंड संघर्ष बघायला मिळतो. आपल्या प्रांताचं पाणी दुसऱ्या प्रांताला देणार नाही, अशी भूमिका मांडत लोकप्रतिनिधी एकमेकांसमोर ठाकले जातात. त्यामुळे जनसामान्य अशा लोकप्रतिनिधींच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं हे साहजिकच आहे. पण खान्देशात फार वेगळं वातावरण बघायला मिळतंय. महाराष्ट्र राज्याच्या पाणी पुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावं लागत आहे. पाणी पुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघात वातावरण इतकं भीषण आहे की, तिथे एका गावात तब्बल 20 ते 25 दिवसांनी पाणी पोहोचतंय. त्यामुळे पाण्यासाठी लाचार झालेली माणसं मिळेल तिथून पाणी मिळवण्यासाठी खटाटोप करत आहेत. गावकरी अतिशय गढूळ पाणी देखील भरुन घेऊन जात आहेत. या नागरिकांच्या आयुष्यात पाणी शोधणं हेच एक ध्येय राहून गेलं आहे, अशी परिस्थिती बघायला मिळतेय. या भयानक परिस्थितीची जाणीव राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना नसणं हे धक्कादायक आहे.

विशेष म्हणजे जळगावमध्ये उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचप्रमाणे जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातही तब्बल 20 ते 25 दिवसांनंतर गावकऱ्यांना पाणीपुरवठा होत आहे. यामुळे गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दिवसभर पाण्यासाठी भटकंती करून मिळेल तसे आणि मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळण्यासाठी नागरिकांची धावपळ पाहायला मिळत आहे. तसेच गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

7 कोटी रुपयांची जलजीवन मिशन योजना रखडली

शिरसोली गाव हे तसं पाहायला गेलं तर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याच जळगाव ग्रामीण मतदारसंघातलं गाव आहे. हे गाव जळगावपासून अवघ्या काही अंतरावर आहे. या शिरसोली गावात तब्बल 7 कोटी रुपयांची जलजीवन मिशन योजना मंजूर करण्यात आली. मात्र ऐनवेळी या योजनेचं काम सब टेंडर करण्यात येऊन ठेकेदारला देण्यात आल्यामुळे काम अपूर्ण अवस्थेत आहे. इथे अनेक तांत्रिक अडचणींमध्ये ही योजना अडकलेली आहे.

ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ

दुसरीकडे ग्रामपंचायतीकडून कुठलीही उपाययोजना न करण्यात आल्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र ग्रामपंचायतचा भोंगळ कारभाराचा नाहक फटका ग्रामस्थांना बसत आहे. ग्रामस्थांवर पाहण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. अबालवृद्ध महिलांसह नागरिकांना गावात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांना दूर-दूर पर्यंत भटकंती करावी लागत आहे.