तुकाराम मुंढे साहेब हे काय चाललंय? चिमुकल्यांच्या आहारात अळ्या, किडे निघाल्याने प्रचंड संताप; जाऊन पाहिलं तर…
Insects in Anganwadi Food : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड गावातून चिमुकल्यांच्या आरोग्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील अंगणवाडीमध्ये लहान बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये सोनकिडे आणि अळ्या आढळून आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्नात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. अशातच आता सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातील खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर येत आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड गावातून चिमुकल्यांच्या आरोग्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील अंगणवाडीमध्ये लहान बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये सोनकिडे आणि अळ्या आढळून आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे अंगणवाडीतील पोषण आहाराच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रकारामुळे पालक आणि गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
भातात आढळल्या अळ्या…
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड येथील अंगणवाडीत चिमुकल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची गावकऱ्यांनी अचानक पाहणी केली. यावेळी आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या वाटाण्यांमध्ये सोनकिडे आढळून आल्याचे समोर आले. तसेच भातामध्येही अळ्या आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये अशा प्रकारे किडे आणि अळ्या आढळल्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला.
अंगणवाडीतील बालकांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पौष्टिक आहार दिला जातो. मात्र, या आहारामध्येच किडे आणि अळ्या आढळून आल्याने बालकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित पोषण आहाराचा दर्जा आणि तो अंगणवाडीपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची साठवणूक कशी केली जाते, याची तपासणी करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
पुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी
या प्रकारामुळे जामखेड गावातील पालकांमध्येही नाराजी व्यक्त केली जात आहे. चिमुकल्या मुलांना निकृष्ट किंवा दूषित अन्न देण्याचा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. पोषण आहाराच्या पुरवठ्याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित पोषण आहाराचा पुरवठा तात्काळ बदलण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित, दर्जेदार आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. चिमुकल्या बालकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पोषण आहाराची तपासणी करावी, दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा पालक आणि ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
