उपोषण सोडायला मुख्यमंत्र्यांनी स्वत: यावं, जरांगे पाटील मागणीवर ठाम; शिंदे काय भूमिका घेणार?

| Updated on: Sep 13, 2023 | 3:19 PM

Manoj Jarange Patil on CM Eknath Shinde Maratha Reservation : सरकारची कसोटी लागलीय, पण आता...; मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार कायम. मुख्यमंत्री शिंदे काय भूमिका घेणार? उपोषण सोडायला स्वत: मुख्यमंत्र्यांनी यावं, जरांगे पाटील मागणीवर ठाम

उपोषण सोडायला मुख्यमंत्र्यांनी स्वत: यावं, जरांगे पाटील मागणीवर ठाम; शिंदे काय भूमिका घेणार?
Follow us on

जालना | 13 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा प्रश्न मागच्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे मागच्या 16 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कालपर्यंत म्हणजे पंधरा दिवस मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण करत होते. आजपासून त्यांचं साखळी उपोषण सुरु झालं आहे. पुढचा महिनाभर हे साखळी उपोषण त्यांच्या या उपोषणाचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. उपोषण सोडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहावं, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच आपली भूमिका मांडतील.

चार दिवसांपूर्वी माझ्या जन्मभूमीतून लोक आले होते. सरकारने आपल्यासोबत डाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण आपण हाणून पाडला. सध्या माणसं अंगावर घालण्याचं काम सुरू आहे. वेळ घालवण्याचं काम सुरू आहे. आता कसोटी सरकारची लागली आहे. पण आपण आता वेळ दिला आहे. एक महिना वेळ दिला आहे. समितीला प्रक्रिया करायला वेळ लागतो म्हणून हा वेळ दिला आहे. पण महिनाभरात सरकारनं यावर तोडगा काढलाच पाहिजे. 30 दिवस पूर्ण झाल्यावर 31 व्या दिवसापासून मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली पाहिजे. नाहीतर पुन्हा उपोषण करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मराठा समाजाला माझं आवाहन आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करा. गावोगावी साखळी उपोषण करा, शांततेत आंदोलन सुरू करा. आपले एवढे शत्रू वाढले आहेत. आपण आता सावध राहिलं पाहिजे. आपल्याला ओबीसी नेते पाठिंबा देऊन गेले. मान खाली जाईल असे काम करणार नाही. आता आपल्यासह सरकारची कसोटी लागली आहे. आपल्या आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात आहे. आपल्याला जागरूक राहणे गरजेचं आहे. नाही तर आपली पुढची पिढी माफ करणार नाही. मुख्यमंत्री आले तर कोणी राजकारण करणार नाही. त्यांना माघारी बोलू नका. आमचे म्हणणे आहे मुख्यमंत्री स्वतः यावं, असं जरांगे म्हणाले आहेत.

जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषण सोडताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. पण प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे आज निर्णय घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी उपस्थित रहावं, असा सरकारमध्ये सूर आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री आज निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.