Manoj Jarange: कुणबी नोंदीनंतर मराठवाड्यात किती प्रमाणपत्रांचं वाटप? आकडाच आला समोर, दाव्यावर जरांगेंचं म्हणणं काय?
Manoj Jarange on Kunbi Certificate: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान काल रात्री जालना जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी त्यांना मराठवाड्यात वाटप करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्र वाटपांची माहिती दिली. त्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली?

अशोक काळकुटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याच्या विरोधात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मराठवाड्यात कुणबी नोंदी नंतर किती प्रमाणपत्रांचं वाटप केलं, याची माहिती जरांगे पाटील यांना दिली. त्यासोबत बीड जिल्ह्यातील आकडेवारी सुद्धा समोर आली आहे. पण जरांगे पाटील यांनी हा विषय अधिकाऱ्यांचा नसून त्यांच्याशी चर्चेस नकार दिला. त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चेची तयारी दर्शवली.
मराठवाड्यातील स्थिती काय?
अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांना दिलेल्या माहितीनुसार, कुणबी नोंदीनंतर मराठवाड्यात 3500 अर्ज दाखल करण्यात आले. त्यातील 3,372 जणांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तर जात प्रमाणपत्राच्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी मराठा नोडल अधिकारी नेमण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात असतील. आता विविध अधिकाऱ्यांशी कॉर्डिनेट करण्याचे काम हे नोडल अधिकारी करतील. हे नोडल अधिकारी शक्यतोवर मराठा समाजाचे असतील. हैदराबाद गॅझेट जेव्हापासून लागू करण्यात आले. त्यानंतर कोर्टात त्याला आव्हान देण्यात आले. यामुळे त्यानंतरचे गॅझेट सरसकट लागू करता येत नाही. कारण कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता असते. महाअधिवक्त्यांच्या अभिप्रायानंतर सातारा, कोल्हापूरसह इतर गॅझेट लागू करण्याचा निर्णय लागू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
बीड जिल्ह्यात किती कुणबी प्रमाणपत्र वाटप?
बीड जिल्ह्यात जरांगे पाटलांच्या आंदोलना दरम्यान 2 लाख 9851 कुणबी प्रमाणपत्र वाटप, तर 11 हजार 422 प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी झाली आहे. बीड जिल्ह्यात कुणबी नोंद मिळाल्यानंतर प्रमाणपत्रासाठी 2 लाख 9872 अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले होते त्यापैकी 2 लाख 9851 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. प्रमाणपत्र वाटपानंतर 13 हजार 754 जणांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केले होते त्यापैकी 11 हजार 422 प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले आहेत तर काही प्रलंबित आहेत. जरांगे पाटलांच्या आंदोलना दरम्यान न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाल्यापासून हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत.
रात्री दीड वाजता उपोषण स्थळी मोठी गर्दी
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा ओघ सुरूच आहे. रात्रीच्या दीड वाजताही उपोषणस्थळी मोठी गर्दी दिसली. मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. प्रकृती खालावल्यानंतर उपोषणस्थळी मराठा बांधव गर्दी करत आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत अंतरवालीतील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जरांगे पाटील उपचार घेत नसल्याने मराठा बांधवांमध्ये काळजी वाढली आहे.