
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यात अजित पवारांच्या विमानाचा अपघात का झाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. 22 पानांच्या या अहवालातून धक्कादायक माहितीही समोर आली आहे. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी ते एका झाडावर कोसळले आणि त्यानंतर ते जमिनीवर आदळले असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. मात्र हा अहवाल अंतिम नाही. या अहवालावर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
जय पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, ‘एएआयबीने दिलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचे पाहून मला खेद वाटत असून वेदना होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला तसेच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबीयांना केवळ औपचारिक माहिती नव्हे तर सत्य पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरे मिळालीच पाहिजेत.’
जय पवार यांनी पुढे म्हटले की, ‘DGCA ने ज्या मुद्द्यांवर VSR Ventures ची काही विमाने ग्राउंड केली आहेत, त्याच मुद्द्यांवर इतर विमानांमध्येही त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाहीत. जर सुरक्षेसंदर्भातील नियम आणि प्रक्रियांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील. तर ते केवळ काही विमानांपूरती कारवाई न करता संपूर्ण व्हीएसआर फ्लीटबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, आवश्यक असल्यास VSR च्या संपूर्ण विमान ताफ्याचे संचालन बंद करण्याचाही DGCA ने विचार करावा.’
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) यांच्याकडून सुरू आहे. या संस्थेने आपला प्राथमिक अहवाल जारी केला आहे. यात हा अपघात एकाच कारणामुळे नव्हे, तर हवामान + पायाभूत सुविधा + ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे घडल्याची शक्यता आहे अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच अपघाताची अंतिम कारणे CVR/FDR सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होतील अशीही माहिती देण्यात आली आहे.