त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडाच्या टोळक्याकडून पत्रकारांना मारहाण, चार जण जखमी, नेमकं काय घडलं?
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी आलेल्या काही पत्रकारांना गुंडाच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आहे, या मारहाणीमध्ये तीन ते चार पत्रकार जखमी झाले आहेत.

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे, नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी आलेल्या काही पत्रकारांना गुंडाच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आहे, या मारहाणीमध्ये तीन ते चार पत्रकार जखमी झाले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरामध्ये ही घटना घडली आहे. इथे काही गुंड अवैध पद्धतीनं गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती देऊन पैशांची वसुली करत होते, त्याच दरम्यान हा प्रकार घडला आहे. या घटनेत पत्रकार किरण ताजणे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर पत्रकार संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, घटनेचा निषेध करण्यात आला आहे, या प्रकरणातील आरोपींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.
एकनाथ शिंदेंकडून दखल
दरम्यान या प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे, त्यांनी या प्रकरणी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला, पत्रकारांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तातडीनं अटक करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहेत. पत्रकारांना मारहाण करणं हे गैर आहे, या घटनेचा मी निषेध करतो, याप्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेत जखमी झालेल्या पत्रकारांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे, भुजबळांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला असून, या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असं मंत्री भुजबळ यांनी म्हटलं आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
