दोन ओला, एक ओटीपी अन् 11 वर्षांची मुलगी पोहोचली थेट कळव्यात…; नेमकं काय घडलं?
कल्याणमध्ये ओटीपी दिल्यानंतर ११ वर्षांची मुलगी ओला कॅबमधून एकटीच रवाना झाल्याने खळबळ उडाली. चालक फोन उचलत नसल्याने निर्माण झालेला हा दीड तासांचा थरार महात्मा फुले पोलिसांनी कसा संपवला, वाचा सविस्तर.

तंत्रज्ञानाचा वापर करताना झालेली एक छोटीशी चूक एका कुटुंबासाठी किती भयानक ठरू शकते, याचा थरार कल्याणमध्ये पाहायला मिळाला. ओला कॅबचा ओटीपी (OTP) दिल्यानंतर प्रवासाला निघालेली ११ वर्षांची चिमुरडी मोठ्या बहिणीपासून ताटातूट होऊन चक्क दुसऱ्या शहराच्या दिशेने रवाना झाली. चालक फोन उचलत नसल्याने दीड तास पालकांच्या आणि पोलिसांच्या काळजाचा ठोका चुकला होता. अखेर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून या मुलीची सुखरूप सुटका केली.
नेमका गोंधळ कसा झाला?
उज्ज्वला माणिक आणि त्यांची ११ वर्षांची लहान बहीण आस्था वर्मा या दोघींना कल्याणहून आपल्या आईला भेटण्यासाठी ठाण्याला जायचे होते. प्रवासाच्या सोयीसाठी त्यांनी दोन ओला कार बुक केल्या होत्या. एक ओला कार बेतूरकर पाडा चौकात पोहोचली. उज्ज्वला यांनी घाईघाईत आस्थाला त्या कारमध्ये बसवले आणि ड्रायव्हरला प्रवासासाठी आवश्यक असलेला ओटीपी (OTP) दिला. त्याच वेळी दुसरी बुक केलेली कार तिथे आली. उज्ज्वला या दुसऱ्या कारमध्ये सामान ठेवण्यात आणि चालकाशी बोलण्यात गुंतल्या.
ओटीपी मिळताच पहिल्या कार चालकाने आपली गाडी सुरू केली आणि तो आस्थाला घेऊन ठाण्याच्या दिशेने निघून गेला. उज्ज्वला यांना वाटले की आस्था अजून तिथेच आहे, पण काही क्षणातच त्यांच्या लक्षात आले की आपली लहान बहीण ज्या गाडीत बसली होती ती गाडी नजरेआड झाली आहे. उज्ज्वला यांनी तातडीने त्या ओला चालकाला फोन लावण्यास सुरुवात केली, मात्र चालक फोन उचलत नव्हता. धावपळीच्या आणि भीतीपोटी उज्ज्वला यांनी भर चौकात रडण्यास सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपस्थित नागरिकांनी त्यांना धीर दिला आणि तातडीने ११२ या पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधला.
या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालकृष्ण परदेशी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी देखील आपल्या अधिकृत फोनवरून चालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने पोलिसांचा फोनही उचलला नाही. यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि परिसरात अपहरणाची भीती पसरली.
कसा केला तपास?
यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर दीड तासांच्या प्रयत्नानंतर चालकाने फोन उचलला. तोपर्यंत तो गाडी घेऊन कळव्यापर्यंत पोहोचला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी यांनी चालकाला कडक शब्दात विचारले की, तुझ्या गाडीत बसलेली मुलगी कुठे आहे? तेव्हा चालकाने ती मुलगी सुरक्षित असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला कोणतीही तडजोड न करता गाडी तातडीने पुन्हा कल्याणला वळवण्याचे आणि ज्या ठिकाणाहून मुलीला घेतले होते तिथेच सोडण्याचे आदेश दिले.
साधारण तासाभरानंतर ती ओला कार पुन्हा बेतूरकर पाडा चौकात आली. गाडीतून आपली लहान बहीण आस्था हसऱ्या चेहऱ्याने उतरताना पाहताच मोठी बहीण उज्ज्वला यांना आपले अश्रू अनावर झाले. त्यांनी धावत जाऊन आस्थाला मिठी मारली. पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि एका कुटुंबाची झालेली वाताहत वाचवल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी महात्मा फुले पोलिसांचे आभार मानले आहेत.
