Kalyan Dombivli : भटक्या कुत्र्यांच्या नावाखाली अधिकारी भरतायेत स्वतःचे खिसे, नसबंदीबद्दल धक्कादायक माहिती समोर
कल्याण मधील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा सर्वत्र चर्चेत आहे. पण कल्याण-डोंबिवलीतल्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी काँग्रेसकडून धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

कल्याण शहरात (Kalyan News) गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद घातला आहे. कल्याण स्टेशन परिसर आणि खडकपाडा परिसरात दोन दिवसात तब्बल 200 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. याप्रकरणी खडकपाडा येथील उच्छाद घालणाऱ्या कुत्र्याला जेरबंद करण्यात महापालिकेला यश मिळालं असून त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पण यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत, धक्कादायक दावा केला आहे.
कल्याणमध्ये भटक्या श्वानांचा कहर पाहायला मिळत आहे. दोन दिवसात 200 हून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चाव घेतला आहे. यावर काँग्रेस आक्रमक झाली असून नसबंदीवर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या नावाखाली अधिकारी भरतायेत स्वतःचे खिसे
भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे शहरात भीतीचं वातावरण असताना, कांचन कुलकर्णी यांनी धक्कादायक दावा केला आहे. नसबंदीबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांची पोलखोल केली आहे. कुलकर्णी यांनी केलेल्या दाव्यानुसार, नसबंदीची खूण असलेली मादी श्वान गर्भवती असल्याचं त्यांनी सांगितलं.
नसबंदी न करताच केवळ कागदोपत्री काम दाखवत बिल काढल्याचे गंभीर आरोप अधिकारी आणि ठेकेदारांवर करण्यात आले आहेत. ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून संबंधित अधिकारी-ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील काँग्रेसने केली आहे.
150 हून अधिक डॉग बाईटचे रुग्ण
कुत्र्यांच्या होणाऱ्या सततच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, एका दिवसांत वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये कुत्रा चावल्याने उपचारासाठी नागरिक पोहोचले. समोर येत असलेल्या आकड्यानुसार 48 रुग्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाले होते.
48 पैकी 46 रुग्णांना अँटी-रेबीज इंजेक्शन देऊन घरी सोडण्यात आलं. पण त्यामधील 2 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मुंबई येथील सायन रुग्णालयात जाण्यास सांगितलं. तर अनेकांवर खासगी रुग्णालयांमध्ये देखील उपचार सुरु आहे. सांगायचं झालं तर, अनेक परिसर असे देखील जेथे एकाच जागी अनेक कुत्रे असतात. ज्यामुळे रस्त्यावरून चालताना देखील नागरिकांना भीती वाटते. एवढंच नाही तर, लहान मुलांमध्ये देखील भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने योग्ये वेळेत कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.