कल्याणच्या शिवप्रेमीकडून शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीत मानवंदना, रिक्षात साकारला दुर्गाडी किल्ला

| Updated on: Feb 19, 2021 | 6:52 PM

कल्याणच्या एका शिवप्रेमीकडून अनोख्या पद्धतीने महाराजांना मानवंदना देण्यात आली आहे (Kalyan Shivpremi creat Durgadi fort in auto rickshaw)

कल्याणच्या शिवप्रेमीकडून शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीत मानवंदना, रिक्षात साकारला दुर्गाडी किल्ला
Follow us on

ठाणे : राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह आहे. राज्यात सध्या कोरोनाने पुन्हा डोकंवर काढल्याने शिवजयंतीच्या उत्साहावर काहीशी बंधने आली आहेत. मात्र, तरीदेखील कल्याणच्या एका शिवप्रेमीकडून अनोख्या पद्धतीने महाराजांना मानवंदना देण्यात आली आहे. कल्याणमधील बिर्ला कॉलेज परिसरात राहणाऱ्या लंकेश कोठीवाले या रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षात शिवाजी महाराजांचा आणि गडकिल्ल्याचा देखावा साकारला आहे. त्याने गडकिल्ल्याचा देखावा साकारुन शिवाजी महाराजांविषयी असलेले प्रचंड प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे. त्याची रिक्षा या देखाव्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे (Kalyan Shivpremi creat Durgadi fort in auto rickshaw).

लंकेश कोठीवाले यांचे मूळ गाव शिवनेरी किल्ल्यानजीक आहे. त्यांचे गावी येणे-जाणे असते. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. कोठीवाले यांना शिवाजी महाराजांविषयी प्रचंड आदर आहे. ते सध्या बिर्ला कॉलेज येथील शिवकॉलनीत राहतात. ते 1996 सालापासून रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना पत्नी, तीन मुले आहे. मुले शिक्षण घेत आहे.

शिवाजी महाराजांच्या विषयी असलेला आदर व्यक्त करण्यासाठी कोठीवले यांनी रिक्षात शिवाजी महाराजांच्या गडाचा देखावा साकारला आहे. लहान मुलांच्या मदतीने हा देखावा साकारण्यात आला आहे. त्यांचा हा देखावा शिवजयंती निमित्त चर्चेचा विषय ठरतोय (Kalyan Shivpremi creat Durgadi fort in auto rickshaw).

दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी महाराजांनी भारतीय आरमाराचा पाया रचला

दुर्गाडी किल्ल्याची मोठी ख्याती आहे. शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये कल्याणसह भिवंडीवर ताबा मिळवला. कल्याण हे त्या काळचं महत्त्वाचं बंदर होतं. या बंदरावर ताबा मिळवल्यानंतर महाराजांनी इथे किल्ला उभारण्याचा आदेश दिला. आबाजी महादेवांना येथे किल्ल्याचा पाया रचत असताना खोदकाम करताना द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असताना द्रव्य मिळावी, ही दुर्गादेवीचीच कृपादृष्टी समजावी, या भावनेने किल्ल्याचं नाव दुर्गाडी ठेवण्यात आलं. दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशीच शिवाजी महाराजांनी भारतीय आरमाराचा पाया रचला. तिथे त्यांनी लढाऊ जहाजं तयार केली.

हेही वाचा : कोल्हापुरातील शिवप्रेमीची अनोखी कहाणी, पठ्ठ्याने स्कूटरच शिवमय केली