Nashik| कंगनाचा राजसत्तेतील काही लोकांकडून उपयोग; कवी आणि अभिनेता किशोर कदमांचे परखड वक्तव्य

| Updated on: Dec 05, 2021 | 11:51 AM

कंगनाचा राजसत्तेतील काही लोकांकडून उपयोग केला जात असावा, असे परखड मत कवी आणि अभिनेता किशोर कदम यांनी व्यक्त केले.

Nashik| कंगनाचा राजसत्तेतील काही लोकांकडून उपयोग; कवी आणि अभिनेता किशोर कदमांचे परखड वक्तव्य
कंगना राणावत
Follow us on

कुसुमाग्रजनगरी, नाशिकः कंगनाचा राजसत्तेतील काही लोकांकडून उपयोग केला जात असावा, असे परखड मत कवी आणि अभिनेता किशोर कदम यांनी व्यक्त केले. मी कवी आहे. नट म्हणून काम करत असताना संवेदनशील कवितांचा परिणाम हा अभिनयावर देखील होतो. त्यामुळे कवी आणि नट म्हणून भूमिका बजावत असताना कविता हा माझ्या जगण्याचा भाग झाल्याचे त्यांनी सांगितले. ते कुसुमाग्रजनगरीत आयोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात ‘संवाद लक्ष्यवेधी कवींशी’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संवादक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. गविंद काजरेकर, कवी प्रफुल्ल शिलेदार, किशोर कदम, सुचिता खल्लाळ, खलील मोमीन, वैभव जोशी यांनी आपले कवितेविषयीचे मत मांडले. यावेळी कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, समन्वयक विश्वास ठाकूर उपस्थित होते.

भूमिकेसाठी कविता उपयोगी

कवी किशोर कदम म्हणाले की, संवेदनशील भूमिका मांडण्यासाठी कविता अधिक उपयोगी ठरते. कविता लिहिणारा कवी यात स्त्री-पुरुष भेद नको. जगण्याची भीती प्रत्येक कालावधीत होती. त्यामुळे मला देखील भीती वाटते, असे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, कंगना राणावत नटी म्हणून चांगली आहे. मात्र, तिच्या मताशी मी सहमत नाही. राजसत्तेतील काही लोकांकडून तिचा उपयोग केला जात असावा किंवा आपल्याला पटत नसताना देखील ठासून सांगण्याच्या प्रयत्न केला जात आहे, असे मला वाटते. तिच्या मताशी मी अजिबात सहमत नसून, त्याविषयी काही बोलावे असे मला वाटत नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

बालकविता लिहिणे अवघड

कवयित्री सुचिता खल्लाळ म्हणाल्या, आजूबाजूला जे घडत आहे ते कवितेत मांडल गेले पाहिजे वाटते. कवितेत काव्य अतिशय महत्वाचे असते. मी कविता एन्जॉय करतो असे, मत खलील मोमीन यांनी व्यक्त केले. तर बाल कविता लिहिणे मला खूप अवघड वाटते. कारण चौकटीच्या बाहेर जाऊन लिहिणे आवश्यक असते, असे मत व्यक्त करत काही निवडक कवितांचे सादरीकरण केले. कवी प्रफुल्ल शिलेदार म्हणाले, अनेक कवितांचे अनुवाद केले आहेत, परंतु अनुवाद करताना त्यामागचा हेतू काय हे समजून घेणे आवश्यक असते. मराठी भाषा अधिक समृद्ध आहे. इतर भाषेतून आपल्या भाषेत अनुवाद करतांना ती नाविन्यपूर्ण वाटली पाहिजे. अनुवाद हा एक प्रकारे कवीला मिळणारी तालीम असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी नाशिकचे कवी राजू देसले यांच्या प्रसिद्ध काव्य संग्रहास स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या वतीने पाच हजार रुपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

इतर बातम्याः

Nashik| मी या भाषेत फडफडत राहीन, कोलटकरच्या भिजक्या वहीवरचं कासव कवेत घेईन; अन् अख्खे कविसंमेलन भारावले…!

Nashik| इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही…पांढरपट्टे यांच्या गझल सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध