ही माझी शेवटची निवडणूक, राणेंनी कणकवलीचे…; निकालापूर्वीच ठाकरे गटाच्या उमेदवाराचे मोठे विधान

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालापूर्वी संदेश पारकर भावूक झाले असून, ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना साकडे घातले आहे.

ही माझी शेवटची निवडणूक, राणेंनी कणकवलीचे...; निकालापूर्वीच ठाकरे गटाच्या उमेदवाराचे मोठे विधान
uddhav thackeray nilesh rane
| Updated on: Dec 21, 2025 | 9:01 AM

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची धाकधूक शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता शहर विकास आघाडीचे मुख्य शिलेदार आणि ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांनी मोठे विधान केले आहे. ही माझी नगरपंचायतीची शेवटची निवडणूक आहे, मतदारांनी मला एकदा संधी द्यावी, असे आवाहन करताना संदेश पारकर यांनी केले. यावेळी ते कमालीचे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यासोबतच त्यांनी कणकवली शहराचे महत्त्व आणि येथील राजकीय संस्कृती जपण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे नमूद केले.

यावेळी संदेश पारकर यांनी नगरपरिषदेसाठी झालेल्या मतदानावर भाष्य केले. कणकवलीतील ८० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. हे मतदान केवळ आकडेवारी नसून ते शहराच्या परिवर्तनासाठी पडलेले पाऊल आहे. आम्ही भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवलीचा नारा दिला होता. त्याला शहरवासियांनी उत्स्फूर्त साथ दिली आहे. कणकवलीतील भ्रष्ट टोळीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते आपली राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून एकत्र आले, असे संदेश पारकर यांनी म्हटले.

निलेश राणे यांनी कणकवलीचे पालकत्व स्वीकारावे

या निवडणुकीत निलेश राणे यांनी घेतलेल्या मेहनतीचे पारकर यांनी कौतुक केले. दुबार मतदारांबाबत निलेश राणे यांनी केलेले आरोप वास्तव होते आणि सत्तेचा गैरवापर करून कशा प्रकारे बोगस मतदान नोंदवले जाते, याची पोलखोल निलेश राणेंनी केली. निलेश राणे यांनी कणकवलीचे पालकत्व स्वीकारावे ही माझी भूमिका होती आणि आहे,” असे मत संदेश पारकर यांनी यावेळी व्यक्त केले.

तुमच्यात हिंमत असेल तर…

जर सत्ताधाऱ्यांनी खरोखरच विकास केला होता, तर त्यांना पैसे का वाटावे लागले? मला बदनाम करण्याचा आणि विकत घेण्याचाही प्रयत्न झाला. तुमच्यात हिंमत असेल तर भालचंद्र महाराजांच्या समाधीवर या, स्वयंभूच्या मंदिरात येऊन फुल उचला आणि सांगा की संदेश पारकर यांनी पैसे मागितले. जर तुम्ही तसे केले तर मी उमेदवारी अर्ज मागे घेतो, अन्यथा तुम्ही पालकमंत्री पदाचा राजीनामा द्या, असा आरोप संदेश पारकर यांनी केला.

माझी नगरपंचायत निवडणूक ही शेवटची आहे. मला एक संधी द्या, असे आव्हान मी मतदारांना केलं होत. जर तसा कौल मिळाला तर माझी जबाबदारी राहील. आपल्याला मिळालेले नारळ हे निवडणूक चिन्ह केवळ चिन्ह नसून तो शाश्वत विकासाचा श्रीफळ आहे. जनतेचा कौल मिळाला तर कणकवलीच्या विकासाचा शुभारंभ आम्ही नारळ वाढवूनच करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निवडणूक संपली की राजकारण संपले, आता निकालाचा जो काही कौल असेल तो आम्ही लोकशाही मार्गाने स्वीकारू. जनतेच्या प्रेमावर आणि आशीर्वादावर आम्ही नक्कीच निवडून येणार, असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला.