
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या करुणा मुंडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. करुणा मुंडे या स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यातच आता करुणा मुंडे यांनी नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच्या भेटीचा तपशील जाहीर केला. यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि अजित पवारांशी संबंधित वादांवर अत्यंत रोखठोक मते मांडली.
करुणा मुंडे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. आम्ही स्वराज्य शक्ती सेना या नावाने एक संघटना उभारली आहे. आम्ही निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रयत्नशील आहोत. झोपेतून उठलो आणि आचारसंहिता लागली. अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. पण आम्ही तयार आहोत, असे करुणा मुंडे म्हणाल्या.
यावेळी करुणा मुंडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आणि राजकीय पाठिंब्याचा मुद्दा होता. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, याबद्दल मी त्यांच्याशी बोलले. सुप्रिया सुळे यांनी यावेळी आम्हाला स्पष्ट आश्वासन दिले आहे की, ‘जिथे जिथे तुम्हाला सपोर्ट लागेल, तिकडे आम्ही करू आणि जिथे आम्हाला सपोर्ट लागेल, तिकडे तुम्ही सपोर्ट करा. याचा अर्थ स्वराज्य शक्ती सेनेला एका मोठ्या पक्षाकडून सहकार्याचे संकेत मिळाले आहेत. मी स्वतः बीड जिल्ह्यातील परळीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा करेन, असे आवाहन करुणा मुंडे यांनी दिले आहे.
करुणा मुंडे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यशैलीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यासोबतच त्यांनी दोन्ही रुपालींच्या वादावर भाष्य केले. रुपाली चाकणकर यांना एवढा मोठा सपोर्ट मिळतो, तो काय रूप बघून दिला की काय बघून दिला, हे मला माहीत नाही. पण महिलांसाठी त्यांचे काहीही काम नाही. तरीही त्यांना इतका मोठा पाठिंबा का दिला जातो, हे कळत नाही. मी यापूर्वीच रुपाली चाकणकर यांच्या विरोधात राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे आणि त्यांच्यावर कोर्टात केस देखील केली आहे. एका महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाने ठोस भूमिका घेतली नाही. मी सुप्रिया सुळेंना सांगितले आहे की, जोपर्यंत पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळत नाही, तोवर शांत बसू नका, असे करुणा मुंडे म्हणाल्या.
पार्थ पवार यांच्याशी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. अजित पवारांशी संबंधित वादामुळे पूर्ण राष्ट्रवादीचीच इमेज खराब होत आहे. याचे परिणाम सर्व आमदार आणि खासदारांच्या प्रतिमेवर होत आहेत.हे सर्व कोण करत आहे, याचा तपास करावा लागेल. मुंबईत बसून एकजण हा सगळा राजकीय खेळ करत आहे, आणि तो महाराष्ट्राचा आका आहे,” असा थेट आणि गंभीर आरोप त्यांनी केला, ज्यामुळे अनेक राजकीय तर्क वितर्कांना वाव मिळाला आहे.