पेरणी कधी करायची? शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज; काय आहे अपडेट?
मान्सून केरळात दाखल झाल्याने महाराष्ट्रात लवकरच पावसाची शक्यता आहे. कृषी विभागाने 100 मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असली तरी, युरिया खताचा तुटवडा आणि पाण्याची कमतरता शेतकऱ्यांपुढे आव्हाने निर्माण करत आहे. बियाणे उगवणक्षमता तपासण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

अखेर ज्याची सर्वचजण वाट पाहत होते तो मान्सून केरळात दाखल झाला आहे. काही दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने येणार आहे. मान्सूनच्या आगमनामुळे कोकणासह दक्षिण महाराष्ट्रासाठी मान्सूनचे पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे येत्या 48 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बळीराजासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. दूधात साखर म्हणजे बळीराजांनी पेरणी कधी करावी याबाबतचीही अपडेट समोर आली आहे. या नव्या अपडेटमुळे बळीराजाला कामाला लागावे लागणार आहे.
जालन्याच्या कृषी विभागाकडून मोठी अपडेट आली आहे. मृग नक्षत्र तोंडावर आले असताना जालना जिल्ह्यातील बळीराजाची खरीप हंगामाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्याच्या खरीप हंगामाच्या आराखड्यानुसार यंदा 6 लाख 47 हजार हेक्टर वर पेरणी अपेक्षित आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 21 हजार हेक्टरने पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान विभागाने यंदा कमी पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तरच पेरणी करावी, असं आवाहन कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना करण्यात आलेल आहे. दरम्यान यंदाही दरवर्षीप्रमाणे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पसंती कापूस आणि सोयाबीन पिकालाच असल्याचं पाहायला मिळते.
पावसाची प्रतिक्षा
दरम्यान, साताऱ्यात शेतकऱ्यांनी पेरणीची संपूर्ण तयारी केली आहे. मात्र शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सूनपूर्व पाऊस न पडल्याने पेरणी पूर्व मशागतची कामे खोळंबली आहेत. कराड तालुक्यात 66 हजार 376 हेक्टर शेती क्षेत्र तर सातारा जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 639 हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. उन्हाळी पाऊस न पडल्याने पाण्याचे स्तोत्र आटली असून पाणी पातळी खालावली आहे. याचा ऊस पिकावरही परिणाम झाला असल्याचे समोर येत आहे.
युरिया खताचा तुटवडा
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात सध्या युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मान्सून काही दिवसांत दाखल होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शेतीपूर्व तयारी पूर्ण केली असून आता पावसाची प्रतीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर खत आणि बियाणे खरेदीसाठी शेतकरी बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहेत. मात्र, यंदा खत आणि बियाण्यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एकीकडे शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना दुसरीकडे उत्पादन खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परळी तालुक्यातील अनेक खत विक्रेत्यांकडे युरिया खत उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.
काही शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत असून शासकीय दरापेक्षा 50 ते 100 रुपये अधिक दिल्यास खत उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान, पारंपरिक युरियाऐवजी ‘नॅनो युरिया’ वापरण्याचा सल्ला काही विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी दुकानदारांकडे ‘कॉसमॉस ऑनलाइन सिस्टीम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी आणि आवश्यक माहिती नोंदवल्यानंतरच खत विक्री केली जात असल्याचे सांगितले जात आहे
सोयाबीन बियाणांचा साठा
आगामी खरीप हंगामासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घरगुती सोयाबीन बियाणे साठवून ठेवले आहेत. मात्र ही बियाणे थेट पेरणीसाठी वापरण्यापूर्वी त्यांची उगवण क्षमता तपासणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना उगवण चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उगवण चाचणीसाठी 100 बियाणे ओल्या कापडात किंवा गोणपाटात ठेवून 5 ते 7 दिवस निरीक्षण केले जाते. यामध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त बियाणे उगवली तर ते बियाणे पेरणीसाठी योग्य मानले जाते. कमी उगवण आढळल्यास बियाण्याचे प्रमाण वाढवावे किंवा नवीन बियाणे वापरावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञ देत आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे 1 लाख 54 हजार 875 क्विंटल सोयाबीन बियाणे राखून ठेवले असून त्याचा वापर केल्यास बाजारातून बियाणे खरेदी करण्याचा खर्च वाचणार आहे.