बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान…त्या विधानावर किरण पावसकरांचं शेवटी स्पष्टीकरण; म्हणाले मी कधीही…
मी जर बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला तर एकनाथ शिंदे मला पक्षात ठेवतील का? शिवसेना पक्षात शिस्त ही सर्वात महत्त्वाची आहे. या शिस्तीचं पालन शिवसेनेत काटेकोरपणे केलं जातं, असे सांगत त्यांनी मी बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केलेला नाही, असे सांगितले.

Kiran Pawaskar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते किरण पावसकर यांनी केलेल्या एका विधानामुळे एकच खळबळ उडाली. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी जाहीर कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. याच कार्यक्रमात किरण पावसकर यांच्यावर सूत्रसंचालनाची जबाबदारी होती. याच कार्यक्रमात त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका विधानाचा उल्लेख केला. हा उल्लेख म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाचा अवमान आहे, असा दावा विरोधकांनी केला. ठाकरे गटाने तर आक्रमक पवित्रा धारण करून पावसकर यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. दरम्यान, प्रकरण तापल्यानंतर आता किरण पावसकर यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करण्याचे धाडस कधीच करणार नाही, असे पावसकर म्हणाले.
त्यावेळी बाळासाहेबांचा विचार केला नाही
मी बाळासाहेबांविषयी बोललो नाही. मी बोललेल्या विधानाला बाळासाहेब ठाकरे यांच्या अवमानाशी जोडले जात असेल तर ते चुकीचे आहे. शिवसेनेची काँग्रेस झाली, तर मी हे दुकान बंद करून टाकेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तेही कधीतरी दाखवा. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत फिरत होते. तेव्हा त्या यात्रेत राहुल गांधी यांना ठाकरे गटाचे नेते मिठी मारायला गेले. त्यावेळी बाळासाहेबांचा विचार केला नाही.
बाळासाहेबांमुळे आम्ही घडलो
आमच्या शिवसेना पक्षातून बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करण्याचं कोणीही धाडस करणार नाही. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातही बाळासाहेबांचा अवमान करेल, असा माणूस सापडणार नाही. बाळासाहेबांमुळे आम्ही घडलो, त्यांनी आम्हाला पदं दिली. आम्ही मोठे झाले. ज्यांच्यामुळे आम्ही मोठे झालो, त्यांचा आम्ही अवमान कसा करणार. सध्या मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करतो आहे. अगोदर मी उद्धव ठाकरे यांच्या कामाला कंटाळून मी राष्ट्रवादीत गेलो होते. त्यावेळीही मी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी काहीही बोललो नव्हते. आता कसं काय बोलू शकेन, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेना पक्षात शिस्त ही सर्वात महत्त्वाची
मी जर बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला तर एकनाथ शिंदे मला पक्षात ठेवतील का? शिवसेना पक्षात शिस्त ही सर्वात महत्त्वाची आहे. या शिस्तीचं पालन शिवसेनेत काटेकोरपणे केलं जातं, असे सांगत त्यांनी मी बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केलेला नाही, असे सांगितले.