ठाकरे गटाने मला ऑफर दिली, पण…; राजू शेट्टी यांची सनसनाटी पत्रकार परिषद

| Updated on: Apr 08, 2024 | 3:56 PM

Raju Shetty on Shivsena Uddhav Thackeray Group Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांची सनसनाटी पत्रकार परिषद...महाविकास आघाडीबाबत राजू शेट्टी काय म्हणाले? लोकसभा निवडणुकीबाबत ते काय म्हणाले? वाचा सविस्तर...

ठाकरे गटाने मला ऑफर दिली, पण...; राजू शेट्टी यांची सनसनाटी पत्रकार परिषद
Follow us on

देशात लोकसभा निवडणूक होतेय. अशात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. तसंच ठाकरे गटाच्या प्रस्तावावर आणि महाविकास आघाडीवर त्यांनी भाष्य केलं. गेल्या सहा महिन्यांपासून हातकणंगले ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली, असं परस्पर सांगितलं जातं होतं. आम्ही तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची साथ सोडली आहे. तसंच महायुतीची साथ आम्ही आधीच सोडलेली आहे. तर भाजपच्या विचारधारेला आम्ही उघड विरोध केला आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.

महाविकास आघाडीबाबत काय म्हणाले?

महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटा अशी विनंती केली. त्यामुळेच मी उद्धव ठाकरे यांना दोनदा भेटायला गेलो होतो. शिवसेना सोडून गेलेल्याना धडा शिकवायचा असेल तर तुम्ही उमेदवार देऊ नका, असं मी बोललो. कारण शिवसेनेकडे त्या ताकदीचा उमेदवार नाही. मी मतदारसंघात काम केलंय. शिवसेना सोडणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर मला पाठींबा द्या असं मी म्हणालो. मात्र शिवसेनेनं अचानक उमेदवार जाहीर केला गेला, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं.

ठाकरे गटाच्या प्रस्तावावर काय म्हणाले?

ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर करण्याच्या आधी काही तास शिवसेना ठाकरे गट माझ्या संपर्कात होता. मला मशाल चिन्हावर लढण्यासाठी ऑफर दिली. मात्र मी शेतकऱ्यांची चळवळ कायम ठेवण्यासाठी मी स्पष्ट नकार दिला. राजकारण करायचं असेल तर कधीच राष्ट्रीय पक्षासोबत गेलो असतो. शिवसेनेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांचे वडील हे एक साखर कारखाना चालवतात. त्यामुळे ही निवडणूक शेतकरी विरुद्ध कारखानदार अशी होईल. काही कारखानदारांना माझा काटा काढण्याची संधी मिळाली असं वाटतं असेल. शिवसेनेला त्यांच्या विरोधकांचा पराभव करायचं होता आणि मला लोकसभा निवडून यायचं होतं, असं राजू शेट्टी म्हणाले.

भाजपवर निशाणा

जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने केले. भाजपने शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले, हमीभाव कायदा आणला नाही. दिल्लीत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं पण त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेतला त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. मात्र त्यावेळी विरोध न करता आता बोललं जात आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम हा शक्तीपीठ महामार्ग करणार आहे, असं म्हणत राजू शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.