Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठं कांड.. वाचून पायाखालची वाळूच सरकेल
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या E-KYC प्रक्रियेत गैरप्रकार उघडकीस आले आहेत. जळगावात एका नराधमाने E-KYC च्या नावाखाली महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली असून, आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी E-KYC अनिवार्य असताना, या फसवणुकीमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ राज्यात जोरदार चर्चा असते. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. कोट्यलधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यामध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पडताळणी करत ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. अनेक लाभार्थी महिलांनी ईकेवायसी केली आहे, पण ज्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्या महिलांना मिळणारा (पैशांचा) लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे, तर ज्या महिलांना लाभार्थींमध्ये बसत नाहीत किंवा अप्तार ठरतात त्यांना आता या योजनेतून वगळण्यात आलं असून यापुढे त्यांना दरमहा 1500 रुपये मिळणार नाही.
ई-केवाझाली यसीची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली, ज्याची मुदत आधी 31 डिसेंबर, 31 मार्चपर्यंत होती मात्र आता ती पुन्हा वाढवून 30 एप्रिल 2026 पर्यंत करण्यात आली आहे. मात्र याच ईकेवायसीची प्रक्रिया करताना अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत असून त्याचाच गैरफायदा काही नराधमांनी घेतल्याचे उघड झाले आहे. लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीच्या नावाखाली मोठं कांड घडल्याचं समोर आलं असून महिलेकडे नको ती मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.
नेमकं घडलं तरी काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, ईकेवायसीच्या बहाण्याने जळगावात गैरप्रकार घडला आहे. ई-केवायसी करून देतो असं सांगत तिथे एका नराधमाने एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्याने आणखी एका महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी केल्याचंही समोर आलं आहे. आरोपीने अशी मागणी करताच ती महिला हादरली, तिच्या पायाखालची वाळूच सरकली, मात्र तिने धीर न गमावता थेट पोलिस स्टेशन गाठत यासंबंधी तक्रार नोंदवली. याप्रकरणी रमेश चव्हाण याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेशी निगडीत ईकेवायसीचे काम करायचे असल्याने आरोपी चव्हाण हा पीडित महिलेच्या घरी आला. त्याने तिच्याकडून कादपत्र घेतली पण काम करून देण्याच्या बदल्यात त्याने शरीरसुखाची मागणी केली. लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शरीर संबंध ठेव, अशी मागणी आरोपीने केल्याचे पीडितेने तिच्या तक्रारीत नमूद केलं आहे.
एवढंच नव्हे तर चव्हाण याने दुसऱ्या एका महिलेशी देखील गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो, असं चव्हाण याने अन्य एका महिलेला सांगितलं आणि तिच्याकडे प्रेमसंबंधाची मागणी केली, असं फिर्यादीत म्हटलं आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीचे आवश्यक प्रक्रिया पार पडून देण्यासाठी महिलांकडे शरीर सुखाची तसेच प्रेम संबंधाची मागणी केल्याच्या या प्रकाराने जळगावात खळबळ उडाली आहे.
दरम्यान राज्य सरकारने ईकेवायसी मुदत वाढवली असून त्यासाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे. महिलांनी या अतिरिक्त कालावधीत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं आहे. ज्यांची केवायसी अद्याप बाकी आहे, किंवा केवायसीमध्ये काही तांत्रिक चूका झाल्या आहेत, त्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे.
