… तोपर्यंत कुणाच्या बापाला घाबरायचं नसतं, अमोल कोल्हे यांनी दिले आव्हान

कोणीतरी खरा चेहरा समोर न आणता माझ्या व्याख्यानाला विरोध केला आहे, जर चेहरा समोर आला असता तर मला त्यांच्याशी संवाद साधायला बरे वाटले असते असेही खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

... तोपर्यंत कुणाच्या बापाला घाबरायचं नसतं, अमोल कोल्हे यांनी दिले आव्हान
amol kolhe
| Updated on: Feb 20, 2026 | 4:55 PM

अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या पुणे विद्यापीठातील भाषणाला काही संघटनानी विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठात प्रचंड बंदोबस्त नेण्यात आला आहे.आता थोड्यावेळापूर्वीच अमोल कोल्हे यांचे पुणे विद्यापीठात आगमन झाले असून त्यांनी यावेळी मीडियाशी बोलताना जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे छत्रपती मांडताय तोपर्यंत कुणाच्या बापाला घाबरायचं नसतं असे आव्हान देत व्याखान घेणारच अशी भूमिका मांडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महराज यांच्या जीवनावर व्याख्यान ठेवण्यात आले आहे. या व्याख्यानाला एका संघटनेने विरोध केला आहे. अभिनेते अमोल कोल्हे यांनी मराठी मालिकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा अभ्यासही केला आहे. त्यामुळे त्यांना या व्याख्यानाला बोलवण्यात आले आहे. मात्र एका संघटनेने विरोध केल्याने पुणे विद्यापीठ परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही आयकार्ड पाहून प्रवेश दिला जात आहे. सायंकाळी अमोल कोल्हे यांचे व्याख्यान असून त्यासाठी ते विद्यापीठात दाखल झाले त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राजकारणाचे जोडे बाहेर ठेवतो

मला कळले की काही विद्यार्थ्यांनी माझ्या व्याख्यानाला विरोध केला आहे. मला त्यांना विनंती करायची आहे.ज्यांनी कोणी विरोध केला आहे. त्यांनी व्याख्यानाला यावे ते ऐकावे मला प्रश्न विचारावेत मी सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहे. ज्या छत्रपतींच्या व्याख्यानाला विरोध होतोय.त्या छत्रपतींच्या राज्याभिषेकालाही विरोध झालाय, याच पुण्यात त्यांचा पहिला अश्वारुढ पुतळा उभारायलाही विरोध झाला होता.छत्रपतींची समाधी १८० वर्षे लोकांच्या स्मरणात राहिली नव्हती ही वस्तू स्थिती आहे. कुठलीही व्याख्यान देणे हा वैचारिक भाग आहे. ती केव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो तेव्हा राजकारणाचे जोडे बाहेर ठेवतो असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले.

कुलगुरूंना सह्यांचे पत्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी इरावती कर्वे सभागृहात अमोल कोल्हे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येईल, असा आक्षेप घेत विरोध केला आहे.‘सकल विद्यार्थी समूहा’च्या वतीने पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना सह्यांचे पत्र देण्यात आले आहे. या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा सर्व समाजाच्या सामूहिक अस्मितेचा उत्सव आहे. केवळ काही लोकांच्या आग्रहामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला निमंत्रित करणे योग्य नसल्याचा आक्षेप या पत्रात घेतला आहे.या व्याख्यानाबाबत शिवजन्मोत्सव विद्यार्थी उत्सव समितीला पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती असेही या पत्रात नमूद केले आले आहे. अशा प्रकारच्या राजकीय हेतूने घेतलेल्या कार्यक्रमास विद्यापीठ समर्थन देते का, याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, तसेच हा कार्यक्रम रद्द करावा,अशी मागणी या संघटनेने केली आहे.