उज्जैनला महाकाल दर्शनासाठी निघाले, प्रवास सुरु केला अन् अचानक…; 4 मित्रांसोबत शेवटच्या क्षणी काय घडलं?
उज्जैनला महाकालेश्वर दर्शनासाठी निघालेल्या गंगाखेड येथील ६ तरुणांच्या कारला जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात झाला. अकोली पुलावर सिमेंट बीमला कार धडकल्याने ४ मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून, भक्तीचा हा प्रवास दुर्दैवी ठरला आहे.

जिंतूर-जालना महामार्गावर बुधवारी मध्यरात्रीनंतर काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. गंगाखेड येथून उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या 6 मित्रांच्या एर्टिगा कारला अकोली नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कार पुलाच्या सिमेंट बीमला इतक्या जोरात धडकली की त्यामध्ये चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गंगाखेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. ऐन प्रवासाच्या सुरुवातीलाच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड येथील ६ मित्र एर्टिगा कारने मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वर दर्शनासाठी निघाले होते. बुधवारी पहाटे १२.१५ वाजता जिंतूर शहराजवळील अकोली नदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर भरधाव कार पुलाच्या सिमेंट बीमला जाऊन जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात मृत्यू झालेले चारही तरुण २६ ते २८ वयोगटातील होते.
मृतांची नावे आली समोर
या भीषण अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले चारही तरुण गंगाखेड परिसरातील आहेत. ऐन उमेदीच्या वयात काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात रोहन संजय राठोड (२८), बालाजी आश्रोबा ओटी (२६), अभिजीत शिंगाडे (२७) आणि बालाजी घोरपडे (२८) या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मित्र उज्जैन येथे महादेवाच्या दर्शनासाठी जात असताना जिंतूरजवळ त्यांच्यावर हा काळाचा घाला आला.
या अपघातात गणेश गोपाळ रोकडे आणि अन्य एक तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
पुढील तपास सुरू
या अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारचा चक्काचूर झाला होता. त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठे प्रयत्न करावे लागले. यावेळी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली. या अपघाताच्या प्राथमिक तपासात चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जिंतूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.
