बोर्डाच्या पेपरमध्ये कॉपी करण्यासाठी लावलं असं डोकं, 81 शिक्षकांवर घरी बसण्याची वेळ, नक्की काय घडलं?
महाराष्ट्र बोर्डाच्या १०वी आणि १२वी परीक्षेत एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी पुरवल्याप्रकरणी ८१ शिक्षकांवर निलंबनाची ऐतिहासिक कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही कॉपी करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली राज्यभरातील ८१ शिक्षकांवर निलंबनाची ऐतिहासिक कारवाई करण्यात आली. शिक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच आर्टिफ़िशियल इंटेलिजन्सचा (AI) अशाप्रकारे गैरवापर समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
बोर्डाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील चौसाळा परीक्षा केंद्रावर संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. यानंतर केलेल्या तपासादरम्यान असे आढळले की, परीक्षा सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच प्रश्नपत्रिकेचे फोटो व्हॉट्सॲपद्वारे बाहेर पाठवले जात होते. हे प्रश्न ChatGPT सारख्या एआय टूल्सवर टाकून त्यांची अचूक उत्तरे मिळवली जात होती. ही उत्तरे चिठ्ठ्यांच्या स्वरूपात किंवा डिजिटल माध्यमांतून थेट वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात असल्याचा प्रकार समोर आला.
या प्रकरणात सर्वाधिक कारवाई बीड जिल्ह्यात झाली आहे. चौसाळा केंद्रातील गैरव्यवहार इतका गंभीर होता की तेथील अनेक शिक्षकांच्या संगनमताने हे रॅकेट सुरु असल्याचे समोर आले. याशिवाय जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागातील काही केंद्रांवरही अशाच प्रकारचे संशयास्पद प्रकार बोर्डाच्या निदर्शनास आले आहेत.
तपासात धक्कादायक बाबीही समोर
यावेळी तपासात काही धक्कादायक बाबीही समोर आल्या आहेत. शिक्षक आणि काही स्थानिक शिक्षण संस्थांचे कर्मचारी मिळून हे रॅकेट चालवत होते. यावेळी जप्त केलेल्या मोबाईल फोन्समध्ये प्रश्नपत्रिकांचे फोटो आणि एआयद्वारे जनरेट केलेली उत्तरे पुराव्यासाठी सापडली आहेत. याप्रकरणी ८१ शिक्षकांचे निलंबन करण्यात आले. या निलंबित ८१ शिक्षकांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. ते दोषी आढळल्यास त्यांची सेवा कायमस्वरूपी खंडित (Dismissal) करण्याची तरतूद बोर्डाने विचारात घेतली आहे.
तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणासाठी व्हावा, फसवणुकीसाठी नाही. या प्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही भरारी पथकांच्या संख्येत वाढ केली आहे. तसेच या घटनेमुळे भविष्यात परीक्षा केंद्रांवर जॅमर (Jammers) बसवण्याचा विचार करत आहोत, अशी माहिती महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्षांनी दिली.
