Devendra Fadnavis | कोण संजय राऊत? देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांना उलटा प्रश्न

Devendra Fadnavis | . उदयनराजे यांनी शिवेंद्र राजेंचा कार्यक्रम उधळून लावला होता. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी दोघांसोबत बैठक केली. सातारा जिल्हा तसेच मसवड MIDC संदर्भात काही महत्वाचे निर्णय झाले.

Devendra Fadnavis | कोण संजय राऊत? देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांना उलटा प्रश्न
Devendra fadnavis
| Edited By: | Updated on: Jun 22, 2023 | 1:18 PM

कराड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांच्यासोबत कराडमध्ये एकत्र बैठक केली. कालच दोन्ही राजेंमध्ये वाद झाला होता. उदयनराजे यांनी शिवेंद्र राजेंचा कार्यक्रम उधळून लावला होता. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी दोघांसोबत बैठक केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागांना पाणी पुरवठ्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. पत्रकारांनी सर्वप्रथम फडणवीस यांना संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाबद्दल प्रश्न विचारला.

झाकीर नाईकने विखे पाटलांच्या संस्थेला निधी दिला, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी कोण संजय राऊत? असा प्रतिप्रश्न केला.

साताऱ्या संदर्भात काय निर्णय झाला?

आज उरमोडी, टेंभू आणि जीए कटापूर या तिन्ही योजनांचा आढावा घेतला. या प्रकल्पातून सातरा जिल्ह्यातील दुष्काळी भागांना पाणी मिळणार आहे. त्याला गती, फेरप्रशासकीय मान्यता देऊन निधी देण्यासंदर्भात निर्णय झाल्याच फडणवीसांनी सांगितलं.

कुठल्या MIDC साठी जमीन अधिग्रहण सुरु होणार?

“प्रशासकीय मान्यता देऊन प्रकल्पाच्या कामाला गती देतोय. दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे” असं फडणवीस म्हणाले. “मुंबई-बँगलोर कॉरिडोअर मार्गावर मसवड एमआयडीसी तयार करायची आहे. अन्य एमआयडीसीचे प्रश्न आहेत. यासंदर्भात आज बैठक घेतली. केंद्र सरकारने प्राथमिक मंजुरी दिली आहे. लवकरच जमीन अधिग्रहण सुरु करणार आहोत. केंद्र सरकारने त्यांचा वाटा उचलण्याच मान्य केलय” असं फडणवीसांनी सांगितलं.

के. चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूरला येण्यावर काय म्हणाले?

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळाला घेऊन दर्शनासाठी पंढरपूरला येणार आहेत. त्या संदर्भात फडणवीसांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, “पंढरपूरला कोणी येऊ शकतो. कोणी भक्तीभावाने येत असेल, तर स्वागत आहे. पण राजकारणासाठी येऊ नये” फडणवीस म्हणाले.