महाराष्ट्राला उन्हाचा तडाखा; उष्माघातामुळे 3 बळी, कोंबड्याही दगावल्या, शाळांना सुट्टी, तुमच्या जिल्ह्यात किती तापमान?
राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये तब्बल 44 ते 45 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोद झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात उष्णतेचा कडाका चांगलाच वाढल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात उष्णतेची लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार पोहोचला आहे. याचा मोठा परिणाम दैनंदीन कामकाजावर होताना दिसत असून, रस्ते आणि बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळत आहे. परभणीमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे परभणीत उष्मघातामुळे पहिला बळी गेला आहे. नाशिक येथून परभणीत भावाकडे आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. परभणीच्या नांदखेड रोड भागात ही घटना घलडी आहे. शिवाजी बबन कांबळे वय 37 असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर शिवाजी कांबळे यांच्या भावाच्या फिर्यादीवरू नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अकोल्यात उष्णतेची लाट कायम
अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट पहायला मिळत आहे. आज अकोला जिल्ह्यामध्ये 44 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी अकोल्यातील तापमानाने 45.6 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे देशातील सर्वाधिक तापमानाचा विक्रेम नोंदवला गेला. आजही त्याच धर्तीवर उष्णतेचा कडाका कायम असून पुढील तीन ते चार दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
या कडक उन्हातही वाहतूक पोलीस कर्तव्य बजावताना दिसत असून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा गॉगल वापरणे, तसेच पाण्याची बाटली सोबत ठेवणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान अकोल्याचे तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नाशिकला उन्हाचा तडाखा
नाशिक जिल्ह्यातील थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात यंदा उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. लासलगाव येथे गेल्या 13 एप्रिलपासून कमाल तापमान सतत 40 अंश सेल्सिअसच्या वर असून आज तापमानाने 42.6 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. या तीव्र उष्णतेचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसत आहे. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) कमी होत असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. उष्णतेमुळे कोंबड्यांचे अन्न व पाणी घेण्याचे प्रमाण घटले असून त्यामुळे त्यांची वाढ मंदावत आहे. याशिवाय, उष्माघातामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत आहेत.
दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये देखील उन्हाचा कडाका वाढला आहे. मालेगावात उष्णतेची तीव्रता वाढली असून आज 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मालेगावमध्ये सध्या एवढी प्रचंड उष्णता आहे की, तापमानाने मागचे सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांनी उन्हापासून संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
दरम्यान मुंबई आणि ठाण्यात देखील तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. मुंबई आणि ठाण्यात 39 अंस सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईला आज उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शहराच्या पूर्व उपनगरांमध्ये तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे तर शेजारील ठाण्यातही ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मात्र पुढील आठवड्यात तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ तापला
विदर्भातील तीन शहरांचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पार पोहोचला आहे, तर तीन शहरांचं तापमान 44 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं आहे. अनेक जिल्ह्यांमधील तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पार पोहोचलं आहे. संपूर्ण विदर्भ उन्हात होरपळत आहे , नागरिक उन्हाने हैरण झाले असून, रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. दरम्यान तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नागपुरात तापमान 44.2 अंश सेल्सियस तर अकोला , अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील तापमान 45 अंश सेल्सियसवर पोहोचलं आहे. तापमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळी कामा शिवाय बाहेर पडू नये , पाणी सोबत ठेवावं, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
विदर्भात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
अकोला – 45.6 अंश सेल्सिअस, अमरावती – 45.6 अंश सेल्सिअस, भंडारा – 44.0 अंश सेल्सिअस, बुलढाणा – 42.2 अंश सेल्सिअस, चंद्रपूर – 44.2 अंश सेल्सिअस, गडचिरोली – 43.6 अंश सेल्सिअस, गोंदिया – 43.6 अंश सेल्सिअस, नागपूर – 44.2 अंश सेल्सिअस, वर्धा – 45.5 अंश सेल्सिअस, वाशीम – 43.0 अंश सेल्सिअस आणि यवतमाळ- 43.0 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.
पुण्यात पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार
शहरात कालपासून पुन्हा एकदा तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पुण्याचं तापमान 40.9 अंशावर पोहोचले आहे. लोहगाव परिसरात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रात्रीच्या तापमानातील सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
अमरावतीमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद
अमरावतीमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. काल अमरावतीचे तापमान 45.6 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आल्याने हा या वर्षीचा सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे. उष्णतेच्या लाटेत अमरावती जिल्हा होरपाळून निघत आहे. चिंतेची बाब म्हणजे आणखी पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून शहरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर दुपारी 11 ते तीन वाजेपर्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका, घराबाहेर पडताना आवश्यक खबरदारी घ्या, व उष्मघाताचे संकेत जाणवल्यास तात्काळ आरोग्य विभागाकडून उपचार करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नंदूरबार जिल्ह्यात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
नंदरबार जिल्हा देखील चांगलाच तापला आहे. जिल्ह्यात 41 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. कमी आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता वाढली असून, त्याचा मोठा त्रास नागरिकांना होत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. पुढील महिन्यात जिल्ह्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात उष्णघाताचे दोन बळी
लातूर जिल्ह्यातल्या गोंद्री इथं उष्माघाताने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताने मृत्यू झाल्याची ही जिल्ह्यातली दुसरी घटना आहे. शिया गोरे असं गोंद्री गावात उष्माघाताने मृत्यू पावलेल्या बाळाचे नाव आहे. यापूर्वी औराद शहाजनी इथंही उष्माघाताने वृद्ध शेतकरी लक्ष्मण भंडारे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. कडाक्याचे ऊन आणि उष्ण हवामान याचा थेट परिणाम शरीरावर होतो आहे.
जळगाव जिल्ह्यात तापमानन 43.3 अंश सेल्सिअसवर
जिल्ह्यात तापमानाच पारा 43.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. जळगावात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उकाडाच्या त्रासामुळे जळगावकर हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे जळगाव शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
