
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघातांची मालिका सुरु आहे. त्यातच आता मराठवाड्यातील जाफराबाद तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जाफराबाद-राजूर रस्त्यावर असलेल्या गाडेगव्हाण फाट्याजवळ एक कार विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जालना जिल्ह्याला हादरा बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालनाच्या जाफराबाद-राजूर रस्त्यावरील गाडेगव्हाण फाट्याजवळ एक कार विहिरीत कोसळली. भोकरदन तालुक्यातील कोपरडा गावातून हे सर्व जण छत्रपती संभाजीनगर येथील सुलतानपूरकडे निघाले होते. यावेळी एका रुग्णाला उपचारासाठी घेऊन जात असताना पहाटे ५ ते ६ च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यालगत मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका व्यक्तीला धडक दिली. त्यानंतर ती कार थेट विहिरीचा कठडा तोडून सुमारे 70 फूट खोल विहिरीत कोसळली.
या विहिरीमध्ये सुमारे 60 फूट पाणी होते. त्यामुळे कारमधील पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस, भोकरदन अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले. विहिरीतील पाणी उपसल्यानंतर पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातात मृत्यू झालेले सर्व जण एकमेकांचे नातेवाईक होते.
दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या सर्वतीर्थ टाकेद येथे रविवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. ऋषिपंचमीच्या निमित्ताने मालेगावमधून दर्शन आणि स्नानासाठी आलेल्या दहा ते बारा महिला या अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्या महिला एका पिकअप वाहनातून प्रवास करत होत्या. मात्र, रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे आणि सततच्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. अपघातानंतर पिकअप गाडी रस्त्याच्या खाली घसरली आणि पलटी झाली, ज्यामुळे महिलांना दुखापत झाली.
हा अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि इतर भाविकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी महिलांना तातडीने सर्वतीर्थ टाकेद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.