Maharashtra News LIVE : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी खळबळ; बड्या डॉक्टरांची चौकशी होणार
Maharashtra News LIVE Updates : धाराशिव जिल्ह्यात आज पहाटे पुन्हा अवकाळी पाऊस बरसला असून धाराशिव, कळंब तालुका वाशी तालुका व तुळजापूर तालुका या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

LIVE NEWS & UPDATES
-
कराड तालुक्याला पावसाचा तडाखा, गोठ्याखाली जनावरे दबली, पत्रे उडाले
कराड तालुक्याला पावसाचा तडाखा बसला असून गारांमुळे 45 कुटुंबाचे सोलर पॅनल्स फुटलेत. तसेच चारचाकी गाडीच्या काचांना तडेही गेले. ओंडला सहा एकरातील कलिंगड पीकाचे नुकसान झालं असून मस्करवाडीत गोठ्याखाली जनावरे दबली, पत्रे उडाल्याची माहिती समोर आली आहे.
-
छत्रपती संभाजीनगर – जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आता सभापती निवडीवर भाजपाचं वर्चस्व
छत्रपती संभाजीनगर – जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आता सभापती निवडीवर भाजपाचं वर्चस्व राहणार. ठाकरे शिवसेनेची तटस्थ राहण्याची भूमिका आहे. कोणत्याही उमेदवाराला मतदान न करण्याचा व्हीप काढण्यात आला. तर शिंदे शिवसेनेचे सदस्य अध्यक्ष पदाच्या निवडीप्रमाणेच सभापती निवडीला गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
-
-
लवकरच घराचे स्वप्न पूर्ण होणार, MMRमधील ६०७ गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराची मंजुरी
मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. महारेराने (MahaRERA) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या क्षेत्रातील तब्बल ६०७ गृहनिर्माण प्रकल्पांना विविध प्रकारच्या मंजुऱ्या दिल्या आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १८५ प्रकल्पांचा समावेश असून, मुंबई उपनगरातील ११६ प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाला आहे. या प्रक्रियेत अनेक नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक देण्यात आले आहेत, तर रखडलेल्या जुन्या प्रकल्पांना मुदतवाढ आणि आवश्यक तांत्रिक सुधारणांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. महारेराच्या या निर्णयामुळे रखडलेले अनेक गृहनिर्माण प्रकल्प आता मार्गी लागणार असून, घरखरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
-
छत्रपती संभाजीनगर : तरुणाला लाकडी बॅटने बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगाव परिसरातून गुंडगिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ कारणावरून श्रृत्विक मच्छिंद्र गाडे या तरुणाला आरोपींनी लाकडी बॅटने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून सतीश पावरे, इरफान पठाण आणि त्यांच्या एका साथीदारावर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भररस्त्यात झालेल्या या मारहाणीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, वाळूज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
-
खेडमध्ये भोंदू बाबाचा दोष निवारणाच्या नावाखाली घाणेरडा प्रकार, शिवदत्त आश्रमातील महाराज फरार
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांडोली येथे अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील शिवदत्त आश्रमात ‘महाराज’ म्हणून वावरणाऱ्या नवनाथ गवळी याने दोष निवारण करून देण्याच्या बहाण्याने महिलांचा विनयभंग करत शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप एका पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी आरोपी अद्याप फरार आहे. सुरुवातीला भीतीपोटी हा प्रकार दडपला गेला होता, मात्र आता पीडितेने धाडसाने तक्रार दिल्यानंतर हे पाखंडी कृत्य उजेडात आले आहे. गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
-
-
जळगावात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीचा तडाखा; धरणगाव तालुक्यात पिके जमीनदोस्त
जळगाव जिल्ह्यात निसर्गाचा कोप पाहायला मिळत असून सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. धरणगाव तालुक्यातील वराड शिवारात या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे. गहू, मका, ज्वारी आणि दादर ही पिके १०० टक्के आडवी होऊन जमीनदोस्त झाली आहेत. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बीकडून अपेक्षा होत्या, मात्र निसर्गाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. धक्कादायक म्हणजे, नुकसानीला ४८ तास उलटूनही अद्याप प्रशासनाचा कोणताही प्रतिनिधी पंचनाम्यासाठी फिरकला नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जुन्या नुकसानीची मदत अद्याप मिळालेली नसताना, आता पुन्हा आलेल्या संकटामुळे कर्ज कसे फेडावे आणि जगावे कसे, असा उद्विग्न सवाल बळीराजा विचारत आहे.
-
भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी खळबळ; एसआयटीकडून बड्या डॉक्टरांची चौकशी
नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एक धक्कादायक अपडेट समोर आले असून, या प्रकरणाचे धागेदोरे वैद्यकीय क्षेत्रापर्यंत पोहोचले आहेत. खरातने महिलांना ओशनो जलच्या नावाखाली गुंगी देणारी औषधे आणि वेदनाशामक गोळ्या देण्यासाठी नाशिकमधील काही बड्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर एसआयटीने (SIT) शहरातील तीन ते चार नामवंत डॉक्टरांची कसून चौकशी केली आहे. विशेष म्हणजे, खरातने एका पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर, तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचाही आरोप आहे. या गोळ्या पुरवणाऱ्या डॉक्टरांचा शोध आता एसआयटी घेत आहे. आज खरातला न्यायालयात हजर केले जाणार असून, तपासादरम्यान हाती लागलेले महत्त्वाचे पुरावे पोलीस न्यायालयासमोर सादर करण्याची शक्यता आहे.
-
सोलापूर : अंजनगाव खेलोबा येथे तणावपूर्ण शांतता; ओबीसी नेते लक्ष्मण हाके गावात जाण्यापासून रोखलं
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून दोन गटांत मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना गावात जाण्यापासून रोखले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने सध्या गावातील वाद निवळला असून शांतता प्रस्थापित झाली आहे. मात्र, पोलिसांनी रोखलेले असतानाही लक्ष्मण हाके अंजनगावात जाण्यावर ठाम असल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
फळबागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका
धाराशिव जिल्ह्यात काल रात्री उशिरा आणि पहाटे तीन वाजता जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बीच्या पिकासह फळबागांचे मोठं नुकसान झालंय काढून टाकलेली ज्वारी,गहू कांदा इतर पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे धाराशिव जिल्ह्यात पंधरा दिवसापासून लगातार अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी मोठा अडचणीत सापडलाय.
-
अशोक खरातच्या पत्नीचा दोन दिवसांपासून पोलीस यंत्रणांना लागेना शोध
SIT आणि शिर्डी पोलीसांची पथके फरार कल्पनाच्या मागावर. कल्पनाचा मोबाईलही नॉट रिचेबल असल्याने लोकेशन मिळण्यात अडचणी येत असल्याची सूत्रांची माहिती. खरात कुटुंबाचा देखिल आर्थिक व्यवहारात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असतांनाच SIT कडून कुटुंबावर वॉच का ठेवण्यात आला नाही ? हा देखिल प्रश्न उपस्थित
-
गेवराईमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक एकरवरील बाजरी पीक जमीनदोस्त
बीडच्या गेवराईमध्ये काल गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामध्ये ज्वारीसह उन्हाळी बाजरी पीक जमीन दोस्त झाले आहे. गारांचा मारा बसल्याने धान्य देखील खराब होऊ लागले. सुरुवातीला कही ठिकाणचे पंचनामे झालेले आहेत मात्र सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणात नुकसान असून पंचनामे झालेले नाहीत. प्रशासनाने पंचनामे करावेत आणि मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
-
एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
खरातच्या कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघडकीस. अशोक खरातने रोख व्यवहारातून उभं केलं आर्थिक साम्राज्य. कोणताही अधिकृत हिशोब नसल्याची शक्यता. ३ दिवसांत खरातच्या तीनदा बँक खात्यांची एसआयटीने तपासणी. व्यवहारांची साखळी उलगडण्यास सुरुवात; मोबाईल मधून डेटा जप्त, महत्त्वाचे पुरावे हाती. खरातची चार वर्षांत सुमारे ७० कोटींची प्रॉपर्टी खरेदी. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमधे मोठी गुंतवणूक
-
भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप
‘श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी’मार्फत कांदा खरेदी-विक्री व्यवहार. मार्च 2024 मध्ये संशयास्पदरीत्या कंपनीला नाफेडची मान्यता. 250+ कंपन्या इच्छुक असताना खरातच्या कंपनीला प्राधान्य. शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती. 7/12 उताऱ्यावर कांदा पीक दाखवले; प्रत्यक्षात द्राक्षबाग आढळल्या.
-
बीडच्या गेवराईमध्ये जोरदार अवकाळी पाऊस
बीडच्या गेवराईमध्ये काल गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामध्ये ज्वारीसह उन्हाळी बाजरी पीक जमीन दोस्त झाले आहे. गारांचा मारा बसल्याने धान्य देखील खराब होऊ लागले. सुरुवातीला कही ठिकाणचे पंचनामे झालेले आहेत. मात्र सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे झालेले नाहीत.
-
एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण. एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर. खरातच्या कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघडकीस. अशोक खरातने रोख व्यवहारातून उभं केलं आर्थिक साम्राज्य.कोणताही अधिकृत हिशोब नसल्याची शक्यता. तीन दिवसांत तीनदा खरातच्या बँक खात्यांची एसआयटीकडून तपासणी. व्यवहारांची साखळी उलगडण्यास सुरुवात. मोबाईल मधून डेटा जप्त, महत्त्वाचे पुरावे हाती लागले.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
छत्रपती संभाजीनगरमध्ये काल झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. वादळी वारे आणि गारपीट मुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल सायंकाळपासून जोरदार वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली. या अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कन्नड, वैजापूर, सिल्लोड, पैठण, सोयगाव आणि फुलंब्री या तालुक्यांमध्ये गारपिटीचा फटका बसला.
-
सिलिंडर आणण्यासाठी जाताना युवकाचा मृत्यू
निमार्णाधीन उड्डाणपुलाचा लोखंडी तराफा कोसळून युवकाचा मृत्यू. सिलिंडर आणण्यासाठी जाताना अमरावती जिल्ह्यातील रिध्दपूर येथे घडली घटना. ईश्वर भूरभुरे असे मृताचे नाव आहे. श्री क्षेत्र रिद्धपूर येथे तिवसा महामार्गावर रेल्वे क्रॉसिंग गेट नं.23 वर आर.व्हि.एस. कन्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे एक वर्षीपासून उड्डाण पुलाचे काम सुरू आहे.दाभेरी येथील ईश्वर भूरभुरे मित्रासोबत घरचे सिलिंडर संपल्यामुळे दुचाकीने तिवसा महामार्गावरून रिद्धपूरला जात होता.
-
रोटवद हनुमान मंदिरावर भाविकांची पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी
जळगावच्या जामनेर तालुक्यातील रोटवद हनुमान मंदिरावर भाविकांची पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी. नवसाला पावणारा मारुती, महाराष्ट्रातील सर्वात उंच मुर्ती आहे कशी आहे ही या हनुमानाच्या तीर्थक्षेत्राची ओळख.दरवर्षी हनुमान जयंतीला मध्यरात्रीपर्यंत लोणी मिश्रित शेंदूर तयार करून मुर्तीला लेपन केले जाते.मुर्ती सजावटीसाठी कागदाने हुबेहूब मनुष्याप्रमाणे मुर्तीला डोळे व इतर अवयव कागद कटिंग करून मुर्तीवर लावले जातात.
-
कल्याण-डोंबिवलीत घराच्या स्वप्नावर पाणी, वाधवा बिल्डरवर गुन्हा दाखल
कल्याण-डोंबिवलीत घराच्या स्वप्नावर पाणी. वाधवा बिल्डरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. विकासकाकडून 200 हून अधिक ग्राहकांची 8 ते 10 कोटींची फसवणूक केल्याचे उघड. 90% रक्कम घेऊनही फ्लॅटचा ताबा नाही. बँकांचीही फसवणूक केल्याने भिवंडीनंतर कल्याण कोळसेवाडी पोलिसांत दुसरा गुन्हा दाखल. फसवणूक करणारी आरोपी अंकित वाधवा आणि आशिष वाधवा बंधू फरार. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता.
-
बापरे, लाडकी बहिण योजनेत इतक्या लाख बहिणी ठरल्या अपात्र
लाडकी बहीण योजनेतील पडताळणी मार्च अखेर पूर्ण. या पडताळणीत अखेर 71 लाख बहिणी अपात्र ठरल्या. त्यांना नोव्हेंबर 2024 पासून सरकार महिना 1500 रुपये अनुदान देत आहे. महिन्याला ही रक्कम 1065 कोटी होती. गेले 20 महिने या अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारने सुमारे 21 हजार 300 कोटी रुपये खर्च केले आहेत.
महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुणे, नाशिकसह 10 जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा. उकाडाही वाढणार. राज्यात सध्या बदलत्या हवामानाचा प्रभाव कायम असून अनेक भागांत पाऊस, वादळी वारे आणि गारपीट होत आहे. भारतीय हवामान विभाग यांनी गुरुवारी राज्यातील विविध भागांना पावसाचा इशारा दिला आहे. मात्र, याचसोबत पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उकाडाही वाढणार आहे. शक्तीतिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्यास मान्यता. शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास केलेल्या विरोधामुळे एक लाख कोटी रुपये खर्चाच्या पवनार ते गोवा सीमेवरील पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) दरम्यानच्या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या (महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग) आखणीत बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला. सुधारित आराखड्यानुसार आता हा मार्ग 13 जिल्ह्यांतील 40 तालुक्यांमधून जात असून माहूर, तुळजापूर, कोल्हापूर या शक्तिपीठांसह 21 धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.