Sanjay Raut: आहो, सुप्रीम कोर्टावरच संशय… संजय राऊतांच्या संतापाचा कडेलोट, काय केला तो मोठा आरोप?
Sanjay Raut on Supreme Court: खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत संविधानिक संस्थांवर जहरी टीका केली. या संस्थांच्या कार्यभाराचे दाखल देत आणि त्यावर संशय घेत त्यांनी खरमरीत टीका केली. त्यांच्या या नव्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी सातत्याने तारीख पे तारीख मिळत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

Sanjay Raut on Election Commission: खासदार संजय राऊत यांनी देशातील संविधानिक संस्था या भाजपच्या अधीन झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी पत्रकार परिषदेत या सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर जहरी टीका केली. काही दाखले आणि संशय व्यक्त करत त्यांनी आरोपांची राळ उडवून दिली. त्यांच्या ताज्या आरोपांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 25-25 असे एकूण 50 आमदार हे भाजपच्या वाटेवर असल्याचा खळबळजनक दावाही राऊतांनी केला.
न्यायपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
देशातील संविधानिक संस्था या सत्तेच्या दबावाखाली आहेत. तसं नसतं तर गौतम अदानींच्या संदर्भात इतके खटले सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचले आणि एकही खटला ते हरले नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा खटला तुम्ही घेतला तर गेल्या चार वर्षांपासून हा खटला सुरू आहे. तारीख पे तारीख मिळत आहे. सुनावणी पूर्ण झाली आहे. अंतिम सुनावणीसाठी वेळ लावल्या जात आहे. पण असा संवैधानिक पेच असलेल्या खटल्यात सुद्धा सर्वोच्च न्यायालय हे खटले गांभीर्याने घेत नाही. तुमच्यावर कुणाचा दबाव आहे, दबाव असेल तर तो सांगा. शिवसेनेचा खटला, पक्ष आणि चिन्ह हा खटला चालवू नये असा आमच्यावर दबाव आहे, असे सरन्यायाधीशांनी हिंमतीने सांगितले पाहिजे, असे राऊत म्हणाले.
न्यायालयात आम्ही जातो कशाला? न्याय मिळावा यासाठीच आणि मार्ग निघावा यासाठीच जातो ना. या देशातील निवडणूक आयोग हा चोर आहे. कालच एका प्रमुख व्यक्तीने निर्मला सीतारमण यांचे पती परकला प्रभाकरराव यांनी आंध्र प्रदेशात रात्री 11 वाजेनंतर 4.7 टक्के म्हणजे 14 लाख मतं राज्यभरात कशी वाढवण्यात आली याचा खुलासाच केला आहे. आता हा विषय आम्ही सुप्रीम कोर्टात घेऊन गेलो तर न्यायालय सांगेल की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. निवडणूक आयोगावर संशय घेता येणार नाही. आहो सुप्रीम कोर्टावरच संशय आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, राष्ट्रपती, राज्यपाल या सर्व संवैधानिक संस्थांवरच जनतेचा संशय आहे. आंध्र सारखाच पॅटर्न पश्चिम बंगालमध्ये राबवला जााणार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही झालं. कोण एकनाथ शिंदे ज्यांना इतक्या जागा मिळाल्या असा आरोप संजय राऊतांनी केली.
आता कोणीही राम शास्त्र नाहीत, सर्व दाम शास्त्री आणि काम शास्त्री
दुर्दैवानं आम्हाला न्यायालयाच्या दारात जावं लागतं. स्वतः उद्धव ठाकरे या न्यायालयीन कामकाजाबाबत निराश आहेत. प्रत्येकवेळी सरन्यायाधीश बदलले की त्यांच्याविषयी छापून येते की ते किती न्यायप्रिय आहेत. सत्यवादी आहेत, रामशास्त्री आहेत. मग ते चंद्रचूड असतील. भूषण गवई असतील वा इतर कुणी असेल. पण इथं कुणीही रामशास्त्री नाहीत. सर्व दाम शास्त्री आणि काम शास्त्री आहेत अशी जहरी टीका संजय राऊतांनी केली.
