ढग कुठवर आले..? दोन दिवसात मोठी गुड न्यूज मिळणार? हवामान विभागाकडून अपडेट काय?
राज्यात उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस आणि मान्सूनपूर्व स्थिती अशी संमिश्र परिस्थिती आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाबाबत स्पष्टता येईल, त्यानंतर महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज कळेल.

राज्यात हवामानाची विचित्र अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. उकाडा आणि अवकाळी या दरम्यान सध्या बळीराजा आणि सामान्य नागरिक भरडून निघाला आहे. तर, दुसरीकडे मान्सून पूर्व पावसाची दस्तकही मिळत आहे. हवामान खात्याने मान्सून बाबतची महत्त्वाची अपडेट दिली आहे. येत्या दोन दिवसात केरळमधील स्थिती समजणार आहे. त्यानंतर पावसाचे महाराष्ट्रात आगमन होणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.
पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी मीडियाला मान्सूनबाबतची महत्त्वाची अपडेट दिली आहे. केरळमध्ये अजून मान्सून दाखल झालेला नाही. पण केरळमध्ये सध्या मान्सूनला पोषक स्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. अंदमान निकोबार भागात सध्या ढग निर्माण झाले आहेत. दोन दिवसात केरळ मधील स्थिती समजेल. हवामान विभागाकडून 26 तारीख आणि किंवा चार पाच दिवसात पावासचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली होती. आणखी दोन दिवस आहेत. त्यामुळे स्थिती समजेल, असं एसडी सानप यांनी सांगितलं.
दोन दिवस वेट अँड वॉच
असं असलं तरी नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होत आहेत. दोन दिवसात केरळमध्ये मान्सूनची स्थिती समजणार आहे. त्यानंतरच महाराष्ट्रात पावसाचं आगमन कधी होईल हे थेट सांगता येणार आहे, अशी माहितीही सानप यांनी दिली.
दोन दिवस उष्णतेची लाट
दरम्यान, अकोला जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने 27 आणि 28 मे रोजी उष्ण लाटेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून नागरिकांना दुपारच्या वेळेत विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरावे तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे अकोला जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना त्रास जाणवत असून रस्त्यांवर दुपारच्या वेळेत शुकशुकाट पहायला मिळत आहे.
घराबाहेर पडू नका
काही दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने बदल होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान 40 अंश सेल्सिअसवर स्थिर असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र हवेत आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यामुळे उकाड्यात मोठी वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत. तापमानाचा पारा तुलनेने कमी असला तरी नंदुरबार शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात तापमानात सातत्याने होणाऱ्या बदलांचा परिणाम मानवी जनजीवनावर होत असून विशेषतः लहान बालकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. रुग्णालयांमध्ये लहान बालकांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा कमी-जास्त होत असला तरी वाऱ्याचा वेग अधिक असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या काही दिवसांत तापमान असेच स्थिर राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून सध्या जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात आहे.
चंद्रपुरात हायअलर्ट
चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढताना दिसत असून उष्णतेची तीव्रता अधिकच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. काल दुपारच्या सुमारास अनेक नागरिकांच्या मोबाईलवर उष्णतेबाबतचा अलर्ट संदेश प्राप्त झाल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील दोन दिवसांसाठीही हीट वेव्हचा इशारा कायम असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.दुपारच्या वेळेत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे, तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.