Kirit Somaiya : किरीट सोमय्या मालेगावात… पत्रकारांना धक्काबुक्की… बांगलादेशींवरून हल्लाबोल
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या मालेगाव दौऱ्यात पत्रकारांना धक्काबुक्की झाली. यावेळी सोमय्यांनी मालेगावला बांगलादेशी घुसखोरांचे आणि अतिरेक्यांचे केंद्र म्हटले. बोगस जन्मदाखल्यांवरून त्यांनी जोरदार हल्लाबोल करत ४४०० दाखले रद्द झाल्याचे व 1083 लोकांवर गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले. पुढील अधिवेशनात बोगस दाखल्यांवर विधेयक येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले, ज्यामुळे मालेगावात तणावपूर्ण वातावरण होते.

भाजपचे नेते किरीट सोमय्या आज मालेगावात आले. त्यामुळे मालेगावात काही काळ तणावाचे वातावरण होते. सोमय्या येणार म्हणून मालेगावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमय्या येताच मीडियाने त्यांना घेरलं आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने सोमय्या यांच्या बॉडीगार्डने पत्रकारांना धक्काबुक्की केली. पत्रकारांशी बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण आणखीनच तापलं होतं. मात्र, त्यानंतर वाद निवळल्याने सोमय्या यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला.
किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्यात आज पत्रकार आणि सोमय्या यांच्या बॉडीगार्डमध्ये बाचबाची झाली. पत्रकार प्रश्न विचारत असताना अचानक गार्डने पत्रकारांशी अरेरावीची भाषा सुरू केली. त्यानंतर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना केली ढकलण्यास सुरुवात केली. तसेच पत्रकारांना धक्काबुक्कीही करण्यात आली. त्यामुळे पत्रकार चांगलेच संतापले होते. सोमय्या यांच्या बॉडीगार्डकडून पत्रकारांना दिलेल्या वागणूकीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पुरावे आले, चौकशी सुरू
दरम्यान, जे अवैध प्रमाणपत्र दिले होते ते रद्द झाले आहेत. ज्यांच्याकडे इथे जन्म झाल्याचा पुरावा आहे त्यांनी पुन्हा अर्ज करावा. जे पुरावे आलेत त्यांची चौकशी सुरु आहे, असं सांगतानाच पुढच्या संसदेच्या अधिवेशनात जन्म दाखला आणि बोगस बांगलादेशींबाबतचं विधेयक सादर केलं जाणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. तसेच बोगस जन्म दाखले दिल्याप्रकरणी मालेगाव शहरात 42 एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
मालेगाव अतिरेक्यांचं केंद्र
बोगस दाखल्यासाठी सर्वाधिक अर्ज मालेगावात आले आहेत. या सर्व अर्जांची चौकशी सुरू आहे. छाननी सुरू आहे. याबाबत मालेगावच्या अनेक लोकांनी माहिती दिली आहे. ज्यांच्याकडे आणखी माहिती असेल त्यांनी द्यावी. मालेगावच्या अधिकाऱ्यांनी बोगस दाखले शोधून काढल्याबद्दल त्यांचे कौतुक केलं पाहिजे, असं सांगतानाच मालेगाव अतिरेक्यांचं केंद्र झालेलं आहे. बोगस बांगलादेशींचा अड्डा झालं आहे, असा आरोप त्यांनी केला.
1083 जणांवर गुन्हे
पोलिस, मनपा, जिल्हाधिकारी यांच्याशी माझी चर्चा झाली. एकूण चार विषयावर चर्चा झाली. SIR, मतदार साफसफाई मोहीम, जी नावं दिली आहेत ती नावे ताबडतोब मतदार यादीतून काढणे, जे दाखले रद्द केले ते नवे काढले यावर चर्चा झाली. 4400 दाखले रद्द झाले आहेत. त्यामुळे अपात्र करण्याची कुणाची ताकद नाही. बांगलादेशी किंवा अपात्र असतील त्यांना पुन्हा दाखला मिळणार नाही. 1083 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 2000 पुराव्यांची चौकशी सुरू आहे, असंही ते म्हणाले. मालेगावात 40 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाई झालीं आहे. कारवाई संदर्भात मुख्यमंत्री वेळ देतील, असंही त्यांनी सांगितलं.
