Manoj Jarange: अंतरवालीत मध्यरात्री 1.15 वाजता काय घडलं? सरकारकडून जरांगेंच्या कोणत्या मागण्या पूर्ण?
Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे काल 30 मे रोजी रखरखत्या उन्हात उपोषणाला बसले होते. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेची भेट घेतली. त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. नंतर मध्यरात्री पुन्हा विखे पाटील आणि प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले. त्यांनी जरांगेंच्या कोणत्या मागण्या पूर्ण केल्या? जाणून घ्या..

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे जालन्यातली अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते. रखरखत्या उन्हात शेतात बाज टाकून मनोज जरांगे पाटीलांनी उपोषण सुरु केले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या निर्णयानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे चित्र दिसू लागले होते. तसेच राजकीय घडामोडींना देखील वेग आला होता. राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या. तसेच त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.
मध्यरात्री काय घडलं?
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर मध्यरात्री १:१५ वाजता पाणी पिऊन स्थगित करण्यात आले आहे. काल रात्री मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. सरकारने अभ्यासकांच्या सर्व दुरुस्त्या मान्य केल्यानंतर, रात्री १०:३० वाजता मंत्री विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. सरकारच्या ड्राफ्टनुसार येत्या मंगळवारपर्यंत (२ जून) शासन निर्णय (GR) काढण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे हे उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जर मंगळवारपर्यंत आदेश निघाले नाहीत, तर पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
तसेच, सातारा गॅझेटियरच्या मुद्यावर सरकारला एक महिन्याचा वेळ देण्याची जरांगे यांची तयारी असली तरी, या काळात कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरूच राहावी अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे. यापुढे आरक्षणाच्या प्रक्रियेत काहीही अडथळे आल्यास किंवा काम थांबल्यास, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनाच जबाबदार धरले जाईल, असा सज्जड दमही मनोज जरांगे यांनी दिला आहे.
जरांगेंच्या मागण्यावर काढला तोडगा
-58 लाख नोंदींचे दस्तावेज जरांगेंना दिले जाणार
-नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रे देणार,
-जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसांत बैठक घेणार
-सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी एक महिना वेळ
-न्या.शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ
-प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन
-आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे-पाटलांचीही स्वतंत्र हेल्पलाईन
-मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार