Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, कुठे पहिला मुक्काम? सरकारचा रोख काय?
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीतून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. सरकारने आवाहन करूनही आणि मुंबई पोलिसांनी दोनदा परवानगी नाकारूनही ते मुंबईत आंदोलनावर ठाम आहेत

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अखेर मुंबईसाठी आताच रवाना झाले. आंतरवाली सराटीतून त्यांचा ताफा निघाला आहे. 15 सप्टेंबर रोजी आपण आंतरवाली सराटीतून मुंबईला जाणार असे त्यांनी दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. तर 19 सप्टेंबर रोजी आझाद मैदानात उपोषण आणि आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान या दोन दिवसांत दोनदा आझाद मैदान पोलिसांनी त्यांचा उपोषणाला परवानगी देण्याचा अर्ज फेटाळला. तिसऱ्यांदा त्यांनी मुंबई पोलिसांकडे अर्ज केला आहे. त्यावर निर्णय अद्याप यायचा असतानाच जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईकडे निघाला आहे. तर त्यांच्यासोबत समर्थक आंदोलकांचीही वाहनं निघाली आहेत. त्यामुळे सरकार आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सगळ्यांनी मराठा समाजाला फसवलंय
आता थोड्यावेळापूर्वी आंतरवाली सराटी येथील हनुमानाचं दर्शन घेऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. त्यांना ओवाळले. यावेळी माध्यमांशी बोलताना सगळ्यांनी मराठा समाजाला फसवलं आहे असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. मराठा समाजाने एकजुटीने राहावे आणि शांतता राखावी असे आवाहन त्यांनी केले. मी सरकारला शरण जाणार नाही, असा इशारही त्यांनी दिला. तर समाजाच्या लेकरांच्या कल्याणासाठी आपला लढा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. जरांगे यांचा पहिला मुक्काम हा पाटोदा येथे होणार आहे.
सरकारने तात्काळ परवानगी द्यावी
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली पाहिजे अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. उत्सवाच्या नावाखाली परवानगी नाकारू नये, परवानगी नसले तरी आम्ही मुंबईला जाऊ, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. जरांगे पाटील उपोषण करतील आम्ही गणपती दर्शन करू असे सांगत मराठा बांधव मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचे दिसले. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी महिला भगिनींचं गणरायाकडे साकडं घालणार असल्याचे ते म्हणाले.
मुंबईत परवानगी मिळण्याची शक्यता धूसर
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक आमरण उपोषणाचा आजचा 18 वा दिवस आहे. काल पोलिसांनी दुसर्यांदा परवानगी नाकारल्यामुळे जरांगे पाटलांनी उपचार घेणे आणि सलाईन घेणे बंद केले आहे. उपचार घेतले नाही तर सकाळपर्यंत अशक्त पणा जाणवेल असा दावा करण्यात येत आहे. काल पुन्हा एक तिसऱ्यांदा परवानगीचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. परवानगी मिळो किंवा नाही मिळो मात्र जरांगे पाटील यांनी मुंबईचा रस्ता धरला आहे. दरम्यान जरांगे पाटील यांना मुंबई पोलीस परवानगी देण्याची शक्यता धूसर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जर दुपारपर्यंत परवानगी दिली नाही तर हायकोर्टात धाव घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.