
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. आज जरांगे पाटील पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मला लोक मारायला उठले आहेत, माझ्या हत्येची सुपारी द्यायला लागले आहेत असा आरोपही जरांगे पाटलांनी केला आहे. तसेच जरांगे पाटलांनी पुन्हा मैदानात उतरण्याची तयारीही केली आहे. जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
मनोज जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘मला मारायला उठले आहेत, सुपाऱ्या द्यायला लागलेत, पण मायबाप जनता आहे तो पर्यंत भीती नाही. सरकारच्या तळी उचलणारे म्हणतात आता कोणी सोबत नाही. एकाच गावात येऊन बघ, समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ लागले, सरकारी चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. मी त्यांच्यासाठी लढलो मग समाज माझ्या मागे राहील ना.’
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘मी जवळचा एक पण मोठा होऊ दिला नाही म्हणून आरोप होतात. मायबाप विचार करून बघा, मोठे करणे म्हणजे काय? काम द्यायची का, समाजाच्या जीवावर मोठे व्हायचे नाही. मी गरीबांच्या लेकरासाठी काम करतो. समाजाच्या जीवावर दुकानदारी चालवणारे, पैसे कमवणाऱ्यांना का मोठे करायचं? मला गोरगरीबांना मोठं करायचं आहे. ज्यांना जवळ राहून मोठे व्हायचे त्यांनी माझ्या जवळ राहू नये.’
मराठा आरक्षणावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, दोन वर्षात 58 लाख नोंदी दिल्या, सातारा संस्थानाचा आदेश निघणार, नायतर घोडे लावतो. मी मराठे मोठे केले म्हणून माझा सुपाऱ्या देत आहेत. जवळचे लोक फोडून काहीही वदवून घेतात. भंगार जातीला खुश करण्यासाठी आपली जात बदनाम करू नका. शेवटी मदतीला जात येते. पुढे बोलताना जरांगे पाटलांनी व्यसन पासून लांब रहा असा सल्ला तरुणांना दिला. आरक्षणाचा लाभ घ्या, आरक्षण घ्या लाजू नका असे आवाहनही उपस्थितांना केले.