…तर माझ्यासहित अख्ख्या मराठा कुटुंबांचा तळतळाट लागणार; जरांगेंचं कुटुंब संतापलं, सरकारला काय आवाहन केलं?
मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. 18 दिवसांपासून उपोषण करत असलेल्या जरांगेंचं कुटुंबाचा संताप व्यक्त होताना दिसत आहे. त्यांनी सरकारला मोठं आवाहन केलं आहे.

मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव आहेत. मनोज जरांगे हे गेल्या 18 दिवसांपासून उपोषणावर आहेत. मरणार पण शरण जाणार, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. मनोज जरांगे हे पाच दिवसांत मुंबईला पोहोचणार आहेत. परंतु 18 दिवसांच्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाने त्यांच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे. त्यांना काही झालं तर माझ्यासहित अख्ख्या मराठा कुटुंबाचा तळतळाट लागेल, अशा शब्दात जरांगेंच्या पत्नीने संताप व्यक्त केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी म्हणाल्या, मनोज जरांगे यांना मुंबईला जाण्याची वेळ सरकारने आणली आहे. अन्यथा मुंबईला गेले नसते. त्यांनी दोन वेळा गुलाल उधळला. त्यांचा सरकारनेच अपमान केला. मुंबईला जाण्याआधी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. पत्नी म्हणून कोणाला वाटतं की, आपला नवरा अन्नावाचून राहावा. माझा नवरा राहत आहे. कारण हे सरकारचं अपयश आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या असत्या, तर त्यांना मुंबईला जाण्याची वेळ आली नसती. एक महिना झाला, त्यांच्याशी बोलणं झालं नाही. सरकारने मुंबईला येण्याआधी तोडगा काढला पाहिजे. उपोषणस्थळी गेल्यापासून ते तिकडेच आहे. मागील 18 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे’.
जरांगेंच्या पत्नी संतापल्या
‘मनोज जरांगेंच्या जीवाला काही झालं ना, माझ्यासहित लेकरांसहित अख्ख्या मराठा कुटुंबाचा त्यांना तळतळाट लागणार. त्यांच्या तब्येतीची चिंता वाटत आहे. कारण 18-18 दिवस काय माणूस 18 तास देखील बिना अन्न पाण्याचं राहू शकत नाही. आज 18 दिवस झाले, त्यांच्या पोटात नाही. हे सरकारला दिसत नाही का? असा सवाल त्यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांची मुलगी म्हणाली, ‘मुलगी म्हणून काळजी वाटत आहे. पण त्यांची मुंबईला जायची तिसरी वेळ आहे. 18 दिवसांचं उपोषण सुरू आहे. सरकारच्या अपयशामुळे मुंबईला जाण्याची वेळ आली आहे. विनंती करूनही सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्यांचा विचार करावं, असं आवाहन सरकारला करते. 14,13,12 मागण्या मान्य केल्या, असं म्हणण्यापेक्षा सगळ्या मागण्या मान्य कराव्या. खरंच मागण्या मान्य कराव्यात, कागदावर ठेवू नका. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करा. एकदा घराच्या बाहेर पडल्यानंतर समाजाचे असतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालं नाही’.
