Manoj Jarnage : मनोज जरांगेंचा तिसऱ्यांदा अर्ज, पोलिसांकडून परवनागी मिळणार का? महत्वाची अपडेट समोर
मनोज जरांगेंनी तिसऱ्यांदा आंदोलनासाठी अर्ज केला आहे. तिसऱ्यांदा अर्ज केल्यानंतर पोलिसांकडून परवनागी मिळणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान महत्वाची अपडेट समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईची वाट धरली आहे. मनोज जरांगे पाटील पाच दिवसांच्या दौऱ्यानंतर मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईत येऊन आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी दोन वेळा अर्ज केला. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली. आता मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी तिसऱ्यांदा अर्ज केला आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अर्जाला परवानगी मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे बोलले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तिसऱ्यांदा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडे अर्ज केला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा अर्ज करत 50 लोकांना आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे. जरांगे यांना तिसऱ्यांदा अर्ज करूनही मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळणे धूसर आहे. गणेशोत्सावदरम्यान कोणत्याही आंदोलनास पोलिसांकडून परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगितले जात आहे. गणेशोत्सवात परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्था प्रश्न उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर या आंदोलनाचा पोलिसांवर ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला गणेशोत्सवानंतरच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त
मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी एकटेच मुंबईला रवाना झाले. मनोज जरांगे पाटील हे साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झाले. शेकडोंच्या संख्येने पोलीस हे मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार आहेत. यात 3 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 10 पोलीस निरीक्षक,30 पोलीस उपनिरीक्षक, 200 सहायक पोलिसांचा समावेश आहे. तर उपनिरीक्षक,490 पोलीस कर्मचारी,होमगार्ड-265, राज्य राखीव दलाचे 90 पोलीस कर्मचारी आणि वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्तात सहभाग आहे. मुंबई जात असताना कुठलाही आंदोलन होऊ नये, रास्ता रोको होऊ नये अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
