Manjo Jarange Patil : मुंबई बंद पडो, मागे जावो, नाहीतर काही होवो… आम्ही येणारच; मनोज जरांगे यांचा निर्वाणीचा इशारा; आर या पारच्या…
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवली सराटीत आजपासून उपोषण सुरू करत त्यांनी मुंबईवर धडक देण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास 'मुंबई बंद पडो, मागे जावो वा काही होवो, आम्ही येणारच' असे जरांगे म्हणाले. हे त्यांचे शेवटचे आंदोलन असून 'आर या पार'च्या लढ्यासाठी त्यांनी मराठा समाजाला सज्ज केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्या लावून धरत मनोज जरांगे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी परत उपोषणााचं हत्यार उपसलं असून आजपासून ते अंतरवली सराटीत आंदोलन करत आहेत. त्यांचं हे शेवटचं आंदोलन असून त्यांनी मुंबईवर धडक देण्याचीही घोषणा केली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईत धडकू असा इशारा त्यांनी आधीच दिला होता. आता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना याचा पुनरुच्चार केला. मुंबईत आंदोलन करणारच आहे, वर्षावरच आंदोलनाला बसणार आहोत आम्ही असं म्हणत मुंबई बंद पडो, मागे जावो , नाहीतर काही होवो, आम्ही येणारच असा निर्वाणीचा इशारा जरांगे यांनी दिला.
जरांगेचा पुन्हा एल्गार
मुंबईत आम्ही आंदोलन करणारच आहोत, वर्षावरच जाऊन बसणार आहोत आम्ही आंदोलनाला. जरा धांबा, दम धरा, बघा कशी लाट उसळते, मराठा आंदोलकांचा महाप्रलय येणार आहे. मुंबईत जाणारच आहेत मराठे, आता माघारी जाणार नाही आम्ही, असं जरांगे म्हणाले. पण आम्हाला मुंबईला नाराज करायचं नाही; मुंबई आमचीच आहे, मुंबईतील लोकं, तिथला मराठी माणूस , ओबीसी माणूस आमचा आहे. मुंबईतील कोणत्याही नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे मराठी आडमुठे नाहीत, सरकार आडमुठेपणाची भूमिका घेत आहे, हे मुंबईकरांना समजलं पाहिजे. आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ देणार आहोत. इथं वेळ देणार आम्ही, पण ते नाही केलं तर मुंबईतली आणि महाराष्ट्रातील सगळी जनता बोलेल सरकारला.. असं ते म्हणाले. आमच्या पोरांपैकी एकालाही हात काय नुसतं बोट लावून तर दाखवा; मग सांगतो तुम्हाला. तुम्हाला राज्यातले, पक्षातले नेते , घराच्याबाहेर सुद्धा मराठे तुम्हाला निघू देणार नाहीत. नेत्यांना सुट्टी देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.
सरकारने आरक्षण दिलं, तर आम्ही मुंबईत येणार नाही. मात्र, आरक्षण दिलं नाही तर 6 कोटी मराठी जनता 45 लाख गाड्या घेऊन मुंबईत येईल. त्यानंतर मुंबई बंद पडो, मागे जावो किंवा काहीही होवो, आम्ही मागे हटणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
आंदोलनाबाबत भूमिका
“समाज आणि समाजातील लेकरांना मोठं करायचं, हेच आमचं स्वप्न आहे. तुम्ही लोकांना किती दिवस येड्यात काढणार? गेली तीन वर्षे आंदोलन केलं; आता हे शेवटचं आंदोलन आहे. सगळ्या पक्षांना आणि नेत्यांना मराठा समाज आपली ताकद दाखवून देणार आहे
भुजबळांवर सडकून टीका
यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. तहसीलदार आणि संबंधित अधिकारी कागदपत्रांची तपासणी करून प्रमाणपत्र देत असताना जातपडताळणी समितीची भूमिका काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भुजबळांना….खडा टाकायची आणि शितोडे उडवायची सवय झाली आहे,असं टीकास्त्र त्यांनी सोडलं. “इतर राज्यांमध्ये अशी व्यवस्था नाही. तहसीलदार सक्षम नाहीत का?” असा प्रश्न त्यांनी केला. जातपडताळणी समित्यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी आक्षेप घेतला.
