मनोज जरांगे यांनी आता शाळेत जावे; छगन भुजबळ यांची खोचक टीका

अन्याय कोणत्याही समाजावर होत असेल तर सर्वांनी एकत्र येऊन त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ती शिकवण आहे असेही छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांनी आता शाळेत जावे; छगन भुजबळ यांची खोचक टीका
jarange patil and chhagan bhujbal
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 24, 2024 | 4:03 PM

मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला उत्तर म्हणून जालनातील वडगोद्री येथे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी दहा दिवस उपोषण केले होते. या उपोषणाची सांगता जरी झाली असली तरी ते उपोषण मिठविण्यासाठी गेलेल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या भाषणावरुन वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणात मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी भुजबळांनी तलवार उपसण्याची भाषा केली आहे. आम्हीही 56 टक्के आहोत, आमचे लोक शांत बसणार काय ? असा उलट सवाल केला होता. त्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांनी आता शाळेत जावे असा खोचक सल्ला दिला आहे.

जालनातील वडगोद्रीत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचे दहा दिवसाचे उपोषण मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने 22 जून रोजी समाप्त झाले. सगेसोयरेच्या अध्यादेशाची सर्वपक्षीय संमती मिळविण्यात आल्यानंतरच अमलबजावणी होईल असे आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाची सांगता झाली. यावेळी व्यासपीठावर छगन भुजबळ यांनी ओबीसींनी एकजूट दाखविण्याचा नारा दिला होता. आपल्या भाषणात भुजबळ यांनी नेहमीप्रमाणे शेरोशायरीची बरसात केली होती, ते म्हणाले की, ‘अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकात भुल गए है, शायद अपनी याद दिलानी होगी’ या शेरोशायरीचा जरांगे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला होता.

तर सर्वांनी त्याचं रक्षण केलं पाहिजे

याप्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की आपण भाषण करतो तेव्हा अशा उपमा दिल्या जातात. परंतू त्याला समजणे शक्य नाही, त्यासाठी थोड शिक्षण महत्वाचं असतं. लोकांना जागृत करण्यासाठी तसे बोलावे लागते. सारखं लेकरं बाळ,लेकरं बाळ म्हणून भावनिक करायचं..आमच्याकडेही लेकरं बाळ आहेत.. बीडमध्ये घरे जाळली..तेव्हा आपलं संरक्षण केलं पाहिजे. अन्याय कोणत्याही समाजावर होत असेल तर सर्वांनी त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ती शिकवण आहे असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. आम्ही शेरो शायरीतून, अभंगातून तशी उदाहरणे देत असतो. नाठाळाच्या माथी हाणू काठी असा अभंग आहे. म्हणून आपण डोक्यात काठी मारत फिरतो का..? पण हे समजायला थोडं तरी शिक्षण लागतं असेही ते म्हणाले.

तिथं समजेल की नाही हे देखील महत्वाचे…

तुझे किती 56 टक्के असू दे किंवा 100 टक्के असू दे. आम्हाला काही फरक पडत नाही.आम्ही कुठे सांगितलं तलवारी काढा..? प्रश्न विचारायला शिका, जागृत व्हायला शिका असे सांगण्यासाठी अशी उदाहरणे दिली जातात. तुझ्याकडे तर पिस्तुलधारी आहेत. तुझ्या आजूबाजूचे कार्यकर्ते शोधले तर अनेक जण सापडतील असे भुजबळ यांनी म्हटले. वाळू माफिया, अजून काय काय माफिया तुझ्या सोबत आहेत, आम्ही लढतो ते आयडिया लॉजी मधून.भाषणातून अनेक उदाहरणे, उपमा देत आम्ही लढतो आहे, ‘चला उठा आयुष्याच्या पेटवा मशाली’ असे उदाहरण दिले म्हणजे कायम मशाली पेटवून ठेवायच्या का..? त्यांनी आता शाळेत जायला पाहिजे, त्याला काय समजत नसेल, पण त्याने शाळेत जावे, तिथं समजेल की नाही हे देखील महत्वाचे, पण त्यांना शाळेत जाण्याची गरज आहे असाही टोला भुजबळ यांनी जरांगेंना लगावला आहे.

 

 

Follow Us