Manoj Jarange: मंडप नाही, सावली नाही… रखरखत्या उन्हात बसणार, उष्माघाताने मेलो तर सरकारच जबाबदार… मनोज जरांगेंचा निर्वाणीचा इशारा
Manoj Jarange: उष्माघातामुळे बळी गेला तर सरकार जबाबदार असेल, फडणवीस जबाबदार असेल असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जरांगे यांनी आरक्षणासाठी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. यावेळचं उपोषण अत्यंत कठोर होणार आहे. देशात असं उपोषण झालं नसेल असं उपोषण करणार आहे. 30 तारखेला उपोषण सुरू होईल. मंडप टाकणार नाही. सावलीत बसणार नाही. थेट रणरणत्या उन्हात बसणार आहे. मी उष्माघाताने मेलो तर त्याला सरकारच जबाबदार असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असीतल, असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत आज पत्रकार परिषद घेतली. भाजपचे नेते प्रसाद लाड हे जरांगेंना भेटायला आले होते. पण त्यानंतरही सरकार दरबारी आरक्षणासाठी काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे हे अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या बोलण्यातून उद्वेग आणि संताप दिसत होता. त्यातूनच त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मी येत्या 30 तारखेला उपोषणा बसणार आहे. आमरण उपोषण असणार आहे. देशात झालं नसेल असं उपोषण होणार आहे. मागच्यावेळी उपोषण करताना मंडप टाकला होता. यावेळी मंडप टाकला जाणार नाही. मी सावलीत बसून उपोषण करणार नाही. असाच जाऊन बसणार आहे. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात मी बसणार आहे. मेलो तर मेलो. कुणीही समाजबांधवांनी अंतरवलीकडे येऊ नका, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
येऊन काय फायदा?
या सरकारला अनेकदा वेळ दिला. कितीदा मुदत दिली. सरकार काही करत नाही. 16 तारखेपासून वेळ दिला. काहीच झालं नाही. 29 ऑगस्टला मुंबईत आलो होतो. तेव्हापासून वेळ दिला. त्यानंतरही काहीच झालं नाही. आता सरकारचे मंत्री अंतरवलीत येऊन काय करणार आहे?, असा सवाल त्यांनी केला.
किती वेळ लागतो?
मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो? पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी सदन नाही. तुम्हाला फक्त मराठ्यांचीच मते हवी आहेत का? बाकी गरीबांच्या समस्यांशी काही देणंघेणं नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.
अंतरवलीत येऊ नका…
मी तुमच्या लेकरांसाठी लढत आहे. लढत राहणार आहे. तुम्ही माझे आहात. पण तुम्ही अंतरवली सराटीत येऊ नका. तुमचा उद्रेक होऊ देऊ नका. तुम्ही शांत राहा. आपल्याला आपलं हक्काचं आरक्षण शांततेने घ्यायचं आहे. आपण लढून कष्ट करणारी औलाद आहोत. आपण लढून साम्राज्य उभी करणारी औलाद आहोत. त्यामुळे निर्धास्त राहा. आपण देणारे आहोत. आज आपल्यावर वेळ आली आहे, तर सर्वच विरोध करत आहेत. आपण देणारे आणि मिळवणारे आहोत, हे विरोधक विसरले आहेत, असं त्यांनी सांगितलं.