मनोज जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली… उपचारही सोडले, दानवे थेट अंतरवलीत; काय घडतंय?
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे उपोषण १० दिवसांपासून सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांनी उपचारांना नकार दिला आहे. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी अंतरवलीत भेट देऊन जरांगे यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची सरकारकडे मागणी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे. त्यांनी पाणी घेण्यासही नकार दिला आहे. तसेच उपचारही नाकारले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये चिंता पसरली आहे. जरांगे यांची प्रकृती खालावल्याने ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे त्यांना भेटण्यासाठी अंतरवलीत आले आहेत. अंतरवलीत येऊन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्याने वैद्यकीय पथक अंतरवलीत ठाण मांडून बसलं आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि त्यांची टीम दाखल त्यांना उपचार घेण्यासाठी आग्रह धरत आहे. मात्र, जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. गेल्या 10 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती अधिक खालावली आहे. काल सायंकाळी जरांगेंची प्रकृती अधिक खालावली होती. मात्र, जरांगे उपचार घेत नाहीयेत, अशी माहिती मराठा आंदोलक अशोक काळकुटे यांनी दिली आहे. दरम्यान, जरांगे यांची प्रकृती खालावल्याने अंतरवलीत मराठा समाजाची मोठी गर्दी झाली आहे.
मागण्या ताबडतोब मान्य करा
अंबादास दानवे यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. दानवे यांनी उपोषण सोडावं अशी विनंती दानवे यांनी केली आहे. जरांगे यांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत, त्या मागण्या ताबडतोब मान्य करण्याची गरज आहे. मी सर्वांशी चर्चा केली, सरकारने दखल घेण्याची आवश्यकता आहे. त्वरेने मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विस्फोट होऊ शकतो आणि त्याला जबाबदार कोण आहे हे सांगायची गरज नाही. सर्टिफिकेट मिळताना अडचणी येत आहेत तर काही जणांचे प्रमाणपत्र रद्द झाले आहेत. यामुळे हे जाणीवपूर्वक होत आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो, असं दानवे यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.
मला पुरावे देण्याची गरज काय?
यावेळी त्यांनी काही सवाल सरकारला केले आहेत. हैद्राबाद गॅझेटचं काय झालं? 55 लाख नोंदी करण्यात आल्या आहेत तर मग प्रमाणपत्र दिले का? माझ्या आजोबांच्या गॅझेटमध्ये कुणबी म्हणून नोंद असेल तर मला पुरावे देण्याची काय गरज आहे? असा सवाल दानवे यांनी केला आहे.
अंतरवलीत मोठी गर्दी
दरम्यान, जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावल्याचं कळताच समाजातील लोकांनी अंतरवलीची वाट धरली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून लोक अंतरवलीत येत आहेत. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत.
