Manusmriti controversy: मला फाशी द्या… जितेंद्र आव्हाड असे का म्हणाले…
मनुस्मृतीचे दहन करण्याचा सर्व कार्यक्रम चांगला झाला. परंतु अनावधानाने माझ्याकडून बाबासाहेबांचा फोटो फाटला. चूक लक्षात येताच बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेची मी माफी मागितली. आता मला फाशी द्या, पण मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या विरोधात उभा राहणार आहे.

महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फटला. त्यानंतर राज्यभरात भारतीय जनता पक्षाने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर महाड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली असली तरी भाजप आक्रमक आहे. राज्यभरात जितेंद्र आव्हाड विरोधात आंदोलन सुरु आहे. त्यावर गुरुवारी जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
भाजप हा माझा वैचारिक शत्रू आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची दखल मी घेत नाही. माझ्याकडून चूक झाली आहे. ती मी मान्य केली आहे. त्यासंदर्भात माफी मागितली आहे. परंतु महात्मा फुले यांच्यावर बोलणारे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवाजी महाराजांवर बोलणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली होती का? मी माफी मागितली असून अनेकांनी माझ्याकडे चुकीने बाबासाहेबांचा फोटो फाटला असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी माझ्यासंदर्भात असेच वक्तव्य केले आहे, त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
मला फाशी द्या..मी मनुवादास विरोध करणारच
मनुस्मृतीचे दहन करण्याचा सर्व कार्यक्रम चांगला झाला. परंतु अनावधानाने माझ्याकडून बाबासाहेबांचा फोटो फाटला. चूक लक्षात येताच बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेची मी माफी मागितली. आता मला फाशी द्या, पण मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या विरोधात उभा राहणार आहे. स्त्री द्वेषाची बिजे रोवणाऱ्या मनुस्मृतीस माझा विरोध असणार आहे. स्त्रियांना जगण्याचा अधिकार नाही, हे मनुस्मृती म्हणते, ते मला मान्य नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
सर्व दलित समाजातील कार्यकर्ते म्हणता, माझ्याकडून ते अनावधनाने झाले आहे. मनुस्मृतीच्या खाली बाबासाहेबांचा फोटो होता, हे माहीत नव्हते. या प्रकरणी माझ्यावर गुन्हे दाखल केला आहे. परंतु मी त्याची चिंता करत नाही. मनुवादास विरोध करतच राहणार आहे.
