MLC Electon : नाशिकसोबत आता जळगावचा देखील प्रश्न सुटला, महाजन यांनी स्पष्ट केले…
देशात राज्यात सर्वत्र विरोधी पक्षांचे बारा वाजले आहेत असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. देशातील सर्वात सक्षम पक्ष म्हणून टीएमसी होता, मात्र आता त्यांचे देखील काय राहिलं आहे..? असाही सवाल त्यांनी यावेळी केला.

राज्यातील १७ विधानपरिषदेच्या जागावर निवडणूक लागली आहे. यातील सहा जागांवर बिनविरोध निवडणूक करण्यात महायुतीला यश मिळत आहे आणि आता शिल्लक ११ जागांवर येत्या १८ जून रोजी निवडणूक होत आहे. नाशिक आणि जळगावात महायुतीला बंडखोरीचा सामना करावा लागला आहे. नाशिक येथे भाजपाचे बंडखोर प्रसाद हिरे यांचे बंड शमवण्यास भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांना यश मिळाले होते. त्यामुळे तेथे आता महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यातच आता जळगावचा तिडा देखील संपल्याचे सुतोवाच मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
नाशिकमधील महायुतीची बंडखोरी क्षमवण्यास भाजपाला यश आले होते. मात्र, जळगावातही पेच कायम होता. जळगावात संख्याबळ भाजपाच्या पारड्यात असल्याने बिनधास्त असलेल्या भाजपाला महायुतील बंडखोरीचा फटका बसला होता. येथे भाजपाने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, एकनाथ शिंदे गटातील रेश्मा काळे यांनी येथे अपक्ष म्हणून बंडाचे निशाण फडकवले होते. मात्र, आता या संदर्भात गिरीश महाजन यांनी नाशिक बरोबरच जळगावमधील देखील बंडखोरी संदर्भातील प्रश्न सुटल्याचे सांगितले आहे.
जळगावमधील विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरी मागे घेण्यासंदर्भात घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घोषणा करतील असे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. जळगाव आणि नाशिक अशा दोघा जागांसदर्भातील महायुतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
सक्षम विरोधी पक्ष राज्यात शिल्लक राहिला पाहिजे
शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरु असल्या संदर्भात विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की शुभेच्छा आहे त्यांना ! चांगलं आहे राहुल गांधी आणि शरद पवार साहेबांची अशी दोघांची टीम मिळून चांगलं काम करतील. सक्षम विरोधी पक्ष राज्यात शिल्लक राहिला पाहिजे, सध्या कोणी शिल्लक नाही. एकत्र येऊन पाहिलं, वेगवेगळ्या होऊन पाहिले. मात्र,काहीही होत नाहीए असेही ते म्हणाले. इंडिया आघाडीचा उल्लेख करत ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी नुकताच पंतप्रधान पदाचा चेहरा कोण ? असा प्रश्न विचारल्यावर त्यांच्यात भांडण सुरू झाली आहेत. पंतप्रधान पदाचा चेहरा कोण ? हे सुद्धा कोणी सांगू शकत नाहीत.. सांगू शकणार नाहीत आणि सांगितले तर ते पुन्हा वेगवेगळे होतील असा दावा महाजन यांनी केला.
