राज ठाकरेंची नाशिक, राजगड दौऱ्यानंतर मुंबईत महत्वाची बैठक; मोठा निर्णय घेणार?
राज ठाकरे दौऱ्यानंतर आता बैठकीकडे वळले आहेत. मुंबईतील बैठकीत महत्वाचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गेल्या काही दिवसांपासून विविध जिल्ह्यात दौरे सुरू आहेत. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यानंतर काल ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर होते. मुंबई-गोवा महामार्गावरून थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी थेट चर्चा केली. राज ठाकरे यांनी दोन जिल्ह्याचे दौरे केल्यानंतर मुंबईतील बैठकीत मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती हाती आली आहे.
दिल्लीत जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन यशस्वी झाल्यानंतर देशातील सर्व विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. विरोधी पक्ष सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरताना दिसत आहे. देशापासून राज्य पातळीवर विरोध आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. नीट पेपरफुटीवरुन धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतरही विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू आहे. राज ठाकरे यांनी दौऱ्यानंतर आता बैठकांचा सपाटा लावला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी मुंबई उपनगरावर लक्ष केंद्रीत केलं आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील नवीन नियुक्त्या आणि पक्षात बदल करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थावर या बैठकीचं आयोजन केल्याची माहिती मिळते. या बैठकीला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. मनसेत पालिका निवडणुकांमध्ये बंडखोरी केलेल्या अनिशा माजगावकर आणि राहुल चव्हाण पुन्हा पक्षात सक्रिय होणार असल्याची माहिती मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून दोघांनाही आज पुन्हा नवीन जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
कोण आहेत बंडखोर नेते?
मुंबई महापालिकेत मनसे तिकीट डावलल्यानंतर अनिशा माजगावकर यांनी मनसेतून पहिली बंडखोरी केली होती. अनिशा माजगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढली होती. त्यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील यांना तगडी फाईट दिली होती. तर चांदिवली विभागातील प्रभाग क्रं. 160 मधून राहुल चव्हाण यांनी बंडखोरी केली होती. आता दोन्ही नेते पुन्हा मनसेत सक्रिय होणार आहेत.
