
Raj Thackeray Speech : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील शीवतीर्थवर दमदार भाषण केले. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. राज्यात सगळकडे ड्रग्ज विकला जातोय. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. अनेक मुलं-मुली गायब आहेत, असे सांगत त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राज ठाकरे यांनी इराण-इस्रायलच्या युद्धावरही भाष्य केले. भारताने इराणला पाठींबा द्यायला हवा होता. भारताने केलेल्या या चुकीचे परिणाम भविष्यात भोगावे लागलतील, अशी भीतीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी खासदार शरद पवार यांचे तोंडभरून कौतूक केले.
मनसेच्या स्थापनेला आज (गुढीपाडवा) 20 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मुंबईतील शीवतीर्थावर राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तींची नावे घेतली. कला, साहित्य, संशोधन, तंत्रज्ञान, इतिहास, राजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे नाव घेत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे वैभव सांगण्याचा प्रयत्न केला. हे सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे तसेच अशा अनेक महापुरुषांची नावे घेतली. याचवेळी त्यांनी शरद पवार यांच्या नावाचाही उल्लेख केला.
आपल्या भाषणात बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख केला. शरद पवार यांनी आतापर्यंत अनेक कामं केली आहेत. आमचे अनेक मतभेद असतील. पण ज्या गोष्टी योग्य आहेत, त्या योग्यच आहेत असे सांगितले पाहिजे. आत तुम्ही रस्त्यावर विकण्यासाठी ठेवलेली फळं पाहतो. पूर्वी दिसत नव्हते. आपण गाडी थांबवली की कोणतरी फळं विकायला घेऊन येतो. शरद पवार यांनी महाराष्ट्रात फलोत्पादनात सर्वात मोठी क्रांती केली. जी फळं पाहिली नव्हती ती आज सर्वसामान्यांना मिळायला लागली. बारामती त्यांनी एआय टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये क्रांती केली. बारामतीमध्ये जाऊन ते पाहिले आहे, असे राज ठाकरे म्हणाले.