Raj Thackrey : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले… राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले…
ठाकरे गटाचे सहा खासदार फुटण्याच्या वृत्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील राजकारणावर चिंता व्यक्त करत, "खासदार फोडणं, आमदार फोडणं" यावर टीका केली. दुष्काळी परिस्थिती असताना हे राजकारण राज्याला कसे नुकसान करत आहे आणि पुढच्या पिढीला काय सांगणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्याने अख्खा राज्यात खळबळ उडाली. शिंदेच्या या ऑपरेशन टायगरमुळे विविध चर्चांना उधाण आलं असून काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ठाकरे गट आणि शिंदे गट, दोघांनीही यावरून एकमेकांवर यथेच्छ टीका केली. आता याच मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील पहिली प्रतिक्रिया आली आहे. 6 खासदार फुटले आणि ते शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्यांवरून राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले. SIR कडे दुर्लक्ष करून नका असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
संपूर्ण देशाचा विचका झालाय, राज्याचा विचका झालयं. आपण आपल्या राज्याचे किती नुकसान करतोय. आज अजून पाऊस पडला नाही, महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती येणार आहे आणि आमच्यातला काय चाललंय खासदार फोडणं, आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं… वाट्टेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, माणसं विकली जात आहेत. या गोष्टीचा विचार राजकारणी, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला नाही पाहिजे, हा विचार, जनतेने केला पाहिजे. ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही चार-पाच तास , उन्हामध्ये रांगेत उभे राहिलात. तो माणूस 50-100 कोटींसाठी विकल जातोय. त्यांना तुम्ही पुन्हा उभे करणार का ? आता ते आले तर तुम्ही निवडून देणार का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
स्वाभिमान मेला की उरतात फक्त जिवंत प्रेतं
एक जुनं वाक्य आहे ते स्वाभिमान मेला ना की उरतात फक्त जिवंत प्रेतं. आणि हे ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात, देशामध्ये सुरू आहे, भविष्यातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना काय सांगणार, आम्ही विकले गेलोत ? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. SIR कडे दुर्लक्ष करू नका याचा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला.
देशात अनेक प्रश्न आज आ वासून उभे असताना, आमच्याकडे काय सुरूये तर आमची सत्ता टिकावी म्हणून आम्ही कोट्यवधी रुपये टाकायला तयार आहोत. आम्हाला खासदार फोडायचे आहेत, आमदार फोडायचे आहेत, नगरसेवक फोडायचे आहेत. तुमच्या मताला किंमत शून्य, रांगेत उभे रहा मेंढरासारखे, मतदान करा मोकळे व्हा असं राज राज ठाकरे म्हणाले. आज हे भाजपकडून सुरूये, उद्या दुसऱ्या पक्षांकडून सुरू होईल, याला निवडणूक म्हणणार का ? मी काल बसलो असताना बोललो बर झालं आपले खासदार निवडून नाही आले, अशी टीका उद्विग्न राज ठाकरेंनी केली.
