Raj Thackrey Speech : बेसावध राहू नका, पायाखालची जमीन गेली ना तर – राज ठाकरेंचा मोठा इशारा
मनसे रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना 'बेसावध राहू नका' असा इशारा दिला. २००८ च्या रेल्वे भरती आंदोलनाची आठवण करून देत, महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी मनसेने केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकला. 'मिसिंग लिंक' प्रकल्प आणि राम मंदिर दानपेटीतील कथित घोटाळ्यावरून त्यांनी सरकारवरही टीका केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार सेनेचा आज वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केलं. मनसेच्या रेल्वे आंदोलनाची सुरूवात कशी झाली ते सांगतानाच रेल्वेत काम करताना बेसावध राहू नका. कुठेही असा बेसावध राहू नका, पायाखालची जमीन सरकली ना तर मग कळेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी मराठी भाषा, मिसिंग लिंक तसेच अनेक मुद्यांवर तर भाष्य केलेच पण राम मंदिराच्या दानपेटीतील झालेल्या घोटाळ्याबाबत बोलतानाही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
काय म्हणाले राज ठाकरे ?
तुमचं आमचं नातं वेगळ्या प्रकारचं आहे. २००८ ला रेल्वे भरतीच्या प्रकरणाचं आंदोलन झालं. त्यातून पक्ष वाढत गेला. पक्षाला निवडणुकीचं चिन्ह रेल्वे इंजिन मिळालं. मला फक्त रेल्वेतून प्रवास करणं एवढंच माहीत आहे. बाकी टेक्निकल मला माहीत नाही. पण ते आंदोलन झालं होतं, ते कधी विसरू नका. आपल्या रेल्वेत महाराष्ट्रातील रेल्वेत मराठी टक्का वाढला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. रेल्वेत काम करताना बेसावध राहू नका, कुठेही असा. त्या सर्व आंदोलनात माझ्यासह महाराष्ट्र सैनिकांवर केसेस झाल्या. मलाही अटक झाली. महाराष्ट्र सैनिकांना अटक झाली, अनेक जण जेलमध्ये होते असं सांगत राज ठाकरे यांनी त्या आंदोलनाच्या काळची परिस्थिती विषद केली.
कसं सुरू झालं आंदोलन ?
तो साधा प्रश्न होता की, महाराष्ट्रात रेल्वे भरती आहे तर त्याच्या जाहिराती महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात का येत नाही?. यूपी बिहारच्या वर्तमानपत्रात का येतात? तिथूनच हे आोदलन सुरू झालं. रेल्वे भरती परीक्षेसाठी हजारो लोक आले. रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपले. महाराष्ट्र सैनिक विचारपासू करायला गेले. परप्रांतियांनी आई-बहिणींवरून शिव्या दिल्या, त्यातून आंदोलन सुरू झालं असं राज ठाकरे म्हणाले.
तेव्हा कळलं की महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत. आणि बाहेरचे लोक आले आहेत. आपल्याला कल्पना नाही. तिकडच्या पेपरमध्ये जाहिराती होत्या. लालू यादव होते. म्हणून घडलं. नंतर ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्यावर त्यांना विषय कळला. त्यानंतर त्यांनी स्थानिक भाषेत पेपर देण्याचा निर्णय झाला आणि स्थानिक वर्तमानपत्रात नोकरी देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर हजारो नोकऱ्या मिळाल्या, असं राज ठाकरे यांनी नमूद केलं.
पायाखालची जमीन सरकली तर अडचण होईल
त्यामुळे रेल्वे स्टेशन असतील रेल्वे भरती असतील त्यावर लक्ष ठेवा, स्टॉल कुणाला दिले जातात त्यावर लक्ष ठेवा. बेसावध राहू नका. पायाखालची जमीन गेली तर अडचण होईल,असं राज ठाकरे म्हणाले. आपल्या सरकारलाच हिंदीची आस्था. फडणवीस यांचं विधानसभेतील भाषण. मिसिंग लिंकवर खांब कोसळला. पाणी येतंय. म्हणे त्याचं राजकारण करू नका. अरे वा. त्याच्यावर बोललं तर राजकारण. इतके दिवस तुम्ही काय करत होता. दुसऱ्यांचं सरकार असताना तुम्ही काय करत होता, असा सवालही त्यांनी विचारला.