Rain Alert : पुढील 5 दिवस धोक्याचे… अतिवृष्टीचे ढग तयार; राज्याच्या या भागाला अलर्ट जारी, समुद्रही खवळणार
Maharashtra Rain Alert : कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. अशातच आता हवामान विभागाने कोकणासह अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्याच्या काही भागात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. अशातच आता हवामान विभागाने कोकणासह अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे 24 ते 28 जून या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोकणात मुसळधार पावसाची हजेरी
आज सकाळपासून रत्नागिरीसह कोकणाच्या विविध भागात पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. कारण अरबी समुद्र आणि किनारपट्टी भागात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. किनारपट्टी भागात अतिवृष्टीचे ढग तयार झाले आहेत. त्यामुळे गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 46 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. तर रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 91 मिलिमीटर पाऊस पडला, तर गुहागर तालुक्यात 76 मिलिमीटर पाऊस पडला. आता अरबी समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच आज आणि उद्या दोन दिवस समुद्र देखील खवळलेला असणार आहे. त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरीला पावसाचा येलो अलर्ट
रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला आहे कारण रखडलेला मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. किनारपट्टी भागात अतिवृष्टीचे ढग तयार होण्यास सुरवात झाली असल्याने 24 ते 28 जून दरम्यान अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात मान्सून दाखल
गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मान्सून अखेर विदर्भात दाखल झाला आहे. मात्र अद्यापही मान्सूनने पूर्ण विदर्भ व्यापलेला नाही अशी माहिती नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. सध्या मान्सून गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाला आहे, आता पुढील दोन ते तीन दिवसांत तो पूर्ण विदर्भ व्यापणार आहे.
पुढील आठवडाभर पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा विदर्भात मान्सून पोहचायला सुमारे 10 दिवसांचा विलंब झाला आहे. 8 ते 21 जून पर्यंत मान्सूनची प्रगती थांबली होती. त्यावर अल निनोचा प्रभाव होता. त्यामुळे अनुकूल परिस्थिती तयार होत नव्हती मात्र आता मान्सून पुढे सरकल्याचे समोर आले आहे. सध्या मान्सून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बराचश्या भागात दाखल झाला आहे. आता पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व आणि पश्चिम विदर्भात सामान्य ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.