अखेर तो आलाच… अंदमानातील समुद्रात मोठा खेळ; मान्सूनची मोठी अपडेट काय?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २६ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, मान्सूनच्या पहिल्या टप्प्यावर 'अल निनो'चा प्रभाव राहण्याची चिन्हे असून, जुलै महिन्यात याचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.

अखेर तो आलाच... अंदमानातील समुद्रात मोठा खेळ; मान्सूनची मोठी अपडेट काय?
Monsoon Rain
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 17, 2026 | 12:38 PM

महाराष्ट्रासह संपूर्ण देश सध्या उन्हाच्या तीव्र चटक्यांनी आणि असह्य उकाड्याने होरपळत असतानाच, देशवासीयांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अखेर दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. अंदमानाच्या समुद्रात झालेल्या या मोठ्या घडामोडीमुळे आता मुख्य भूमीकडे मान्सूनची वाटचाल सुरू झाली असून, अरबी समुद्रातही मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २६ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, मान्सूनच्या पहिल्या टप्प्यावर ‘अल निनो’चा प्रभाव राहण्याची चिन्हे असून, जुलै महिन्यात याचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.

कोकण किनारपट्टीवर दुहेरी मारा: वादळी पावसासह ‘यलो अलर्ट’

मान्सून अंदमानात पोहोचला असला, तरी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर सध्या कडक ऊन आणि वादळी पाऊस असा दुहेरी मारा पाहायला मिळत आहे. कोकणात मान्सूनपूर्व वातावरणाची निर्मिती झाली असून हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे उकाडा कमालीचा वाढला आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग: दक्षिण कोकणातील या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज असून हवामान खात्याने येथे ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

ठाणे आणि रायगड: सोमवारपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतही मान्सूनपूर्व हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबई आणि पालघरमधील वातावरण सध्या कोरडेच राहील.

समुद्र खवळलेला: पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीवर ३० ते ३५ किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना आणि पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे विदर्भात सूर्याचा थरार

एकीकडे कोकणात पावसाचे वातावरण तयार होत असताना, दुसरीकडे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र उन्हाचा कहर सुरूच आहे. महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात काल सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील अमरावती आणि वर्धा येथे झाली. येथे पारा थेट ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.

विदर्भातील प्रमुख शहरांमधील तापमानाचा आकडा खालीलप्रमाणे आहे:

अमरावती आणि वर्धा: ४६.०° C

अकोला: ४५.४° C

यवतमाळ: ४५.२° C

नागपूर: ४३.८° C

चंद्रपूर: ४३.६° C

वाशीम: ४३.२° C

गडचिरोली: ४२.६° C

गोंदिया: ४२.२° C

बुलढाणा: ४१.०° C

विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट (Heat Wave) अशीच कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र, २१-२२ मे नंतर विदर्भातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील आणि २२ तारखेपासून तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

दरम्यान, मुंबईत ‘क्लायमेट ट्रेंड्स’तर्फे आयोजित भारतीय उष्णता परिषदेत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, केवळ बाहेरचे ऊनच नव्हे, तर घरातील बंदिस्त जागेतील उष्ण वातावरणही मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Follow Us